सैनिक देशासाठी न्यायालय सैनिकांसाठी- न्यायमूर्ती श्रीमती अंजू शेंडे.
नालसा वीर परिवार सहाय्यता योजना 2025 उद्घाटन सोहळा संपन्न
सैनिक देशासाठी न्यायालय सैनिकांसाठी- न्यायमूर्ती श्रीमती अंजू शेंडे.
नालसा वीर परिवार सहाय्यता योजना 2025 उद्घाटन सोहळा संपन्न
वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण – नालसा वीर परिवार सहाय्यता योजना 2025 या योजनेचा उद्घाटन सोहळा आज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमती अंजू शेंडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये स्क्वॉड्रन लीडर श्री विद्यासागर कोरडे, सचिव श्री कृष्णा एम. सोनवणे (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) तसेच कर्नल सुनील राजदेव (निवृत्त) उपस्थित होते. मोठ्या संख्येने वीर परिवार व माजी सैनिकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. विद्यासागर कोरडे यांनी करताना सैनिकांच्या मागे उभ्या असलेल्या समाजातील अडचणी दूर करून त्यांना पूर्ण मनाने राष्ट्रसेवा करता यावी, या योजनेचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर श्री. कृष्णा सोनवणे यांनी सैनिक व त्यांच्या परिवारांना न्यायालय कशा प्रकारे कायदेशीर मदत करेल याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. गवई साहेब व मा. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू झाली आहे.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती अंजू शेंडे मॅडम यांनी सांगितले की, “जिल्ह्यात १५ हजारांहून अधिक वीर पत्नी, सैनिक व विधवा राहतात. सैनिक देशासाठी सेवा करतात, पण त्यांच्या अधिकारांबाबत त्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी न्यायालय त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.” पुढे त्या म्हणाल्या की, सैनिकांच्या तक्रारी आता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत निवारण करण्यात येतील. टोल फ्री क्रमांक १५१०० वर फोन करून सैनिक आपली समस्या नोंदवू शकतात.
या योजनेत पोटगी, वैयक्तिक प्रकरणे, शासकीय योजना, सिव्हिल मॅटर, प्रमाणपत्रे, प्रॉपर्टी संबंधित प्रश्न, मुलांचा ताबा, वारसा, आर्थिक गुन्हे इत्यादी बाबींवर सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना निशुल्क कायदेशीर मदत उपलब्ध होणार आहे. “ज्या सैनिकांच्या भरोशावर देश उभा आहे, त्यांच्या सेवेसाठी आम्ही आहोत. सैनिकांच्या माध्यमातून आम्हाला देशसेवेची संधी मिळते,” असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सैनिक कल्याण संघटक श्री. चंद्रकांत शिंदे यांनी सर्व मान्यवर व उपस्थित वीर परिवारांचे आभार मानले.


