ऑनलाईन’ निकालाचा गोंधळ आणि उन्हातील ‘विद्यार्थी शोध’ मोहिमेने शिक्षकांचा जीव धोक्यात; शिक्षक भारतीचा शासनाला आंदोलनाचा इशारा
ऑनलाईन’ निकालाचा गोंधळ आणि उन्हातील ‘विद्यार्थी शोध’ मोहिमेने शिक्षकांचा जीव धोक्यात; शिक्षक भारतीचा शासनाला आंदोलनाचा इशारा
राहुरी तालुका जावेद शेख
शिक्षण विभागाने १० वी आणि १२ वीचे ऑनलाईन निकाल जाहीर करून कौतुक मिळवले असले, तरी प्रत्यक्षात मूळ गुणपत्रके (ऑफलाईन रिझल्ट) न मिळाल्याने राज्यभरात प्रवेश प्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे. दुसरीकडे, तीव्र उष्णतेच्या लाटेत शिक्षकांना ‘विद्यार्थी शोध मोहिमे’साठी सक्तीने रस्त्यावर उतरवले जात असल्याने शिक्षकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षक भारती संघटनेने मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना कायदेशीर निवेदन देऊन प्रशासकीय धोरणांचा जाहीर निषेध केला आहे.
ऑनलाईन निकाल जाहीर होऊनही विद्यार्थ्यांना अद्याप शाळा सोडल्याचे दाखले (LC) आणि मूळ गुणपत्रके मिळालेली नाहीत. यामुळे महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. मूळ कागदपत्रांच्या पडताळणीशिवाय प्रवेश निश्चित होऊ शकत नाही, तरीही प्रवेश प्रक्रिया रेटली जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जोपर्यंत ऑफलाईन निकाल मिळत नाही, तोपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.
उष्णतेची लाट आणि ‘मृत्यूचा सापळा’
शाळांची पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांना ऐन उन्हात ‘विद्यार्थी शोध मोहिमे’साठी बाहेर पाठवले जात आहे. भद्रावती येथे याच मोहिमेदरम्यान आदर्श शिक्षक श्री. राजू हिवंज यांचा उष्माघाताने झालेला मृत्यू आणि मुंबईत ‘बीएलओ’ कर्तव्यावर असताना अनेक शिक्षक आयसीयूमध्ये दाखल होण्याची घटना दै. वृत्तपत्रामधून समोर आली आहे. प्रतिकूल हवामानात अशा कामांची सक्ती करणे हे मानवी हक्कांचे आणि कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांनी ईमेल द्वारे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक जिल्हाधिकारी यांना खालील निवेदनात मागण्या करण्यात आल्या
विमा संरक्षण: निवडणूक, जनगणना किंवा शैक्षणिक मोहिमेवर असताना अपघात किंवा मृत्यू झाल्यास संबंधित शिक्षकाच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांचे विमा कवच व वारसाला शासकीय नोकरी द्यावी.
वैद्यकीय खर्च: कर्तव्यावर असताना आजारी पडणाऱ्या शिक्षकांचा १००% वैद्यकीय खर्च शासनाने उचलणे कायदेशीररित्या बंधनकारक करावे.
सक्ती थांबवा: उष्णतेच्या लाटेचा विचार करून शिक्षकांना फिल्ड वर्कची सक्ती करू नये. या मागणीला आमदार कपिल पाटील,राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे ,कार्याध्यक्ष सुभाष मोरे,विनाअनुदान कृती समिती राज्याध्यक्ष जयवंत भाबड, सचिव सुनील गाडगे,विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, महिला अध्यक्ष रूपालीताई बोरुडे,जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, संघटक चंद्रशेखर हासे,प्रवीण काळे,सहसचिव राहुल कानवडे ,तालुका अध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, साई थोरात,संपत वाळके,दिगंबर देसाई,सचिव वंदना जाधव,कल्पना चौधरी, मफीज इनामदार,दीपक फापाळे,गणपत धुमाळ,विजय पांडे, अमोल तळेकर,संतोष नवले,बाबासाहेब तांबे,अकील फकीर,बाबाजी लाळगे,वैभव चोथे,प्रवीण मालुंजकर,श्याम जगताप, आदींनी पाठिंबा दिला .
”शिक्षण विभागाने केवळ निकालाची घाई केली, पण त्यापुढील प्रवेशाच्या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. उन्हात शिक्षकांचे बळी जात असताना प्रशासन सुस्त आहे. जर यावर तातडीने कायदेशीर तोडगा निघाला नाही, तर मानवी हक्क आयोग आणि न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात येईल.”
— कार्याध्यक्ष शिक्षक भारती संघटना पुणे विभाग


