कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी नव्हे तर सभासद व कामगारांना न्याय देण्यासाठी संजयमामा निवडणूक रिंगणात:- प्रशांत पाटील यांचे नारायण पाटील यांना प्रत्युत्तर

कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी नव्हे तर सभासद व कामगारांना न्याय देण्यासाठी संजयमामा निवडणूक रिंगणात:- प्रशांत पाटील यांचे नारायण पाटील यांना प्रत्युत्तर
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १०/ कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी शिंदे आदिनाथच्या निवडणूक रिंगणात उतरले असल्याची टीका आमदार नारायण पाटील यांनी कंदर येथील प्रचार सभेत संजयमामा शिंदे यांच्यावर केली होती. याला प्रतिउत्तर देताना जेऊर ऊस उत्पादक गटातील महायुती आदिनाथ बचाव पॅनल चे उमेदवार प्रशांत पाटील म्हणाले की, कार्यकर्त्यांनाच नव्हे तर कारखान्याचे सभासद व कामगार या सर्वांना न्याय देण्याची क्षमता मामांकडे आहे. कारण साखर कारखानदारीच्या १६-१७ वर्षाच्या अनुभवाच्या जोरावरती मामा आदिनाथ कारखाना कसल्याही परिस्थितीत चालूच करून दाखवणार आहेत. या उलट विरोधी पॅनलचे उमेदवार आणि त्यांचे पॅनल प्रमुख यांच्याकडे कारखाना चालू करण्याविषयी कोणतेही धोरण नाही, कोणताही प्लॅन नाही. त्यामुळे विरोधी उमेदवार हे सभासद व कामगारांना फसविण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याउलट संजयमामा शिंदे हे मात्र सभासद व कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सुज्ञ सभासदांना हा दोन्ही पॅनल मधील फरक निश्चितच माहित आहे. असा घणाघात श्री प्रशांत पाटील यांनी केला.
संजयमामांनी स्वतःचा कारखाना विकला या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रशांत पाटील म्हणाले की, ज्यांच्या शुभ हस्ते विरोधी पॅनलने प्रचाराचा शुभारंभ केला त्यांनी २ साखर कारखाने विकले आहेत, १ साखर कारखाना सरकारच्या मेहरबानीने चालत आहे. साखर कारखाना सोडून द्या साधी पतसंस्था, सूतगिरणी कुक्कुटपालन संघ यातली एकही संस्था मोहिते पाटलांना व्यवस्थित चालवता आली नाही. सहकारमहर्षी कारखाना हा शेजारच्या श्रीपुर आणि विठ्ठलराव, माळीनगर ह्या कारखान्यापेक्षा टनाला ३०० रुपये दर कमी देत आहे. या गोष्टीमुळे सहकार महर्षीच्या सभासदांनी ह्या अन्यायाला आणि जाचाला कंटाळून विठ्ठलराव शिंदे, पांडुरंग श्रीपुर, गिरमे माळीनगर आणि माजी खासदार निंबाळकर यांच्या कारखान्याला ऊस घालायला सुरू केले आहे. “चोर तो चोर आणि वरून शिरजोर” अशी भूमिका या कारखान्याने घेत या शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्या की तुम्ही जर आमच्या कारखान्याला ऊस घातला नाही तर तुमच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. अशा या मोहिते पाटलांचे नेतृत्व स्वीकारलेले नारायण पाटील आदिनाथ कारखान्यात नेमके काय दिवे लावणार आहे हे सभासदांना वेगळे सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही असा घनाघाती प्रहार त्यांनी केला.