बंद आदिनाथचे दारे निवडणुकीने उघडणार काय ? सभासदांचा संतप्त सवाल

बंद आदिनाथचे दारे निवडणुकीने उघडणार काय ? सभासदांचा संतप्त सवाल
करमाळा / प्रतिनिधी : सचिन जव्हेरी
बंद आदिनाथचे दारे निवडणुकीने उघडणार काय!?संतप्त असा सवाल आदिनाथच्या सभासदातून उपस्थित होत आहे. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीची लगबग सध्या सुरू असून निवडणुकीचा आखाडा आता रंगू लागला आहे. करमाळा तालुक्यातील प्रमुख असलेले राजकीय गट, आम्ही उत्तम प्रकारे चालवू व आदिनाथला झालेल्या कर्जाच्या डोंगरातून मुक्त करून दाखवू, अशा वल्गना जरी सुरू असल्या, तरी *शेजारणीच्या लग्नात सुनेवर माया* या म्हणीनुसार आदिनाथ वर राजकारण्यांची खरी माया आहे, की त्यातून माया मिळवायची आहे, असा नाराजीयुक्त संतप्त सवाल शेतकरी सभासदातून विचारला जात आहे. कारण आदिनाथची आजची झालेली दुर्दशा ही केवळ राजकारणातूनच झाल्याचे मत शेतकरी बांधवातून व्यक्त होत आहे. *आदिनाथ शेतकऱ्यांचे मंदिर पण त्याला लागले अनेक उंदीर* त्यामुळे आज आदिनाथ कारखाना प्रचंड पोखरल्या गेलेला आहे. त्याची पोखरण कोण आणि कशी भरणार ? याचे मात्र नियोजन कोणीही सांगायला तयार नाहीत. फक्त कारखाना आमच्याकडे द्या आम्ही तो चालवून दाखवू, असे म्हणण्याने खरंच कारखाना चालेल काय ? का फक्त *मुंगेरी लाल के हसीन सपने* असा प्रकार तर निवडणुकीनंतर होणार नाही ना? याची जबाबदारी कोण आणि कशी घेणार हा संशोधनाचा विषय होऊन बसला आहे.
आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन, कारखाना निवडणुकीच्या मार्गाला लावून आणखीन अडचणी वाढतील, त्यासाठी हा कारखाना बिनविरोध होणे गरजेचे असून, राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार व विजयसिंह मोहिते पाटील, अजितदादा पवार यांना सर्व अधिकार देऊन सर्वच राजकीय गटांनी एकत्र येऊन कारखाना बिनविरोध करावा, अशी मागणी ही केली होती. याच पत्रकार परिषदेत बोलताना जयवंतराव जगताप म्हणाले होते, की माझ्याकडे कारखाना होता त्यावेळी मी कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या थकलेल्या पगारी या एका महिन्यात दोन दोन पगारी दिल्या होत्या, तर जिल्ह्यात उच्चांकी भाव देत सर्वप्रथम 1201 जिल्ह्यात उच्चांकी भाव मी दिला होता. तर माजी आमदार संजय मामा शिंदे यांनीही, आदिनाथ संदर्भात बैठक घेऊन आदिनाथ आपल्याकडे दिल्यास तो आपण चालवून दाखवू, तर बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनीही, या आदिनाथच्या आखाड्यात पुन्हा एकदा दंड थोपटून महाराष्ट्रच्या सत्तेत एकनाथराव शिंदे शिवसेना असल्याने आम्ही शासनाकडून योग्य ती मदत मिळवून, पुन्हा कारखान्याला गत वैभव प्राप्त करून देऊ. असे म्हणत त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहेत. आदिनाथ कारखान्या चा इतिहास पाहता, आदिनाथ हा ऊसाच्या बागेत असलेला कारखाना असून, येथील राजकीय पुढाऱ्यांनी एकमेकाला कोंडीत पकडण्यासाठी, आदिनाथवर राजकारण न करता, ते करमाळ्याचे एक वैभव असून, त्या कारखान्याला कर्जाच्या डोंगरातून सावरणे आणि पुढच्या पिढीसाठी डोलात त्याला उभा ठेवणे, अत्यावश्यक आहे. वास्तविक आदिनाथ च्या निर्मितीपासूनच, आदिनाथला सतत अडचणीला सामोरे जावे लागण्याची वेळ आलेली असून, तरीही तो बिचारा सगळ्या अडचणीला बाजूला सारत, होईल तेवढी त्याला ओरबडले जात असताना देखील, त्याने गाळप करून अनेकांचे समाधान केलेले आहे. गत पंचवार्षिक निवडणुकी वेळी, हा आदिनाथ डोळे मिटून गप्प होता, त्यावेळी बागल गटाची सत्ता तिथे आली, आणि संतोष पाटलांना तेथे चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी संतोष पाटील यांनी देखील जिवाचे रान करत सलग दोन वर्ष, कारखाना रडत पडत- खडतर प्रवास करत चालवला होता. परंतु अचानक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाने खांदेपालट करण्याचा निर्णय घेत, धनंजय डोंगरे यांना चेअरमन पदी बसविले. आणि डोंगरेंच्या कारकिर्दीत तो कारखाना जो बंद आहे, तो आजतागायत बंद स्थितीतच राहिला आहे. मग अचानक झालेल्या या खांदे पलटीचा निर्णय का ?आणि कशामुळे? झाला होता, याचे गौडबंगाल नेमके काय? असा सवाल शेतकरी बांधव उपस्थित करीत आहेत. आदिनाथची निवडणूक ही प्रत्येक राजकीय गट आज लढविण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत असले, तरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी, या आदिनाथच्या निवडणुकीच्या आखाड्यात माजी आमदार संजय मामा शिंदे व बागल गट असे एकत्रित लढण्याचा प्रस्ताव त्यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे मांडल्याने, राजकारण हे मित्राचा मित्र तो आपला मित्र, आणि मित्राचा शत्रू तो देखील आपला मित्र, याप्रमाणे करण्यासारखा हा प्रस्ताव असल्याचे मत राजकीय जाणकारातून व्यक्त होत आहे. असे असले तरी करमाळा तालुक्यात आदिनाथसह मकाई सहकारी साखर कारखाना, भैरवनाथ शुगर आणि कमलाई शुगर असे चार कारखाने मोठ्या दिमाखात उभे आहेत मात्र या बंद कारखान्याची कुलपाची जादुई चावी, कोणताही राजकीय पुढाऱ्याने लावलेली आजपर्यंत दिसलेली नाही .आता आदिनाथच्या बंद कुलपाची जादुई चावी पवार- मोहिते यांच्याकडेच असल्याचे मत, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केलेले आहे हे मात्र तितकेच खरे!!!!
आगे-आगे देखो होता क्या और खोता है क्या!!!