जंगली प्राण्यांची पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव ; पाण्याच्या शोधात चार हरणांचा मृत्यू

जंगली प्राण्यांची पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव ; पाण्याच्या शोधात चार हरणांचा मृत्यू
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर : अमळनेर तालुक्यातील जंगलांमध्ये वनविभागाने पाणवठे कोरडे ठेवल्याने जंगली प्राणी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत आणि अशातच तीन हरणांचा मृत्यू झाला आहे.सर्वसाधारणपणे फेब्रुवारी पासून उष्णता वाढायला सुरुवात झाली की जंगले ओसाड पडायला लागतात. जंगलातील नैसर्गिक तलाव , पाणवठे कोरडे पडू लागतात. यासाठी वनविभागाला कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे आदेश दिले आहेत. आणि या पाणवठ्यामध्ये पाणी टाकण्यासाठी टँकर अथवा इतर साधनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध केला जातो. मात्र यंदा जंगलातील पाणवठे कोरडे असल्याने पाण्यासाठी जंगली प्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. पाण्याच्या चाहुलने हरणी विहिरींकडे धाव घेत आहेत. आठवडा भरात तापमान वाढल्याने चार वेगवेगळ्या ठिकाणी विहिरीत हरणे पडली. त्यात मंगरूळ आणि जुनोने येथे नागरिकांच्या साहाय्याने त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. मात्र कुऱ्हे ,दोधवद येथे तीन हरणांचा पाण्याच्या शोधात भटकत असताना अपघातात मृत्यू झाला. तर आमोदे येथे विहिरीत पडलेल्या हरणाचे प्राण वाचवता आले नाहीत. वनविभागाने पाणवठ्यामध्ये पाणी का टाकले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमळनेर तालुक्यात जानवे ,डांगर ,ढेकू, रामेश्वर, जुनोने या भागात जंगल आहे. अनेक प्राण्याचा या भागात अधिवास आहे. वनविभागाच्या दुर्लक्षपणामुळे वन संपत्तीचा ऱ्हास होत आहे.