जामखेड तालुक्यातून विकसित कृषि संकल्प कृषि संकल्प अभियानाची सुरुवात

जामखेड तालुक्यातून विकसित कृषि संकल्प कृषि संकल्प अभियानाची सुरुवात
प्रतिनिधी : प्रविण देशमुख
कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली द्वारा संपूर्ण भारत देशात केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे संकल्पनेतून कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून खरीप हंगाम पुर्व विकसित कृषि संकल्प अभियानाचे आयोजन दिनांक २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातून करण्यात आला. दिनांक २९ व ३० मे रोजी जामखेड तालुक्यातील लोणी, बांधखडक, नायगाव, पिंपळवाडी, साकत, शिऊर, पाटोदा, धानोरा-वंजारवाडी, फक्राबाद, धोंड-पारगाव, जवळा आणि पाडळी या निवडक १२ गावात अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने, ता.शेवगाव व आय सी ए आर राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या दृष्टीने तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषि अधिकारी व आत्मा जामखेड च्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना बाबत माहिती दिली. या अभियानाच्या दरम्यान केंद्राच्या मार्फत कृषि रथ फिरवून कृषि योजना व कृषि तंत्रज्ञान विषयी जन-जागृती करण्यात आली. इफको च्या माध्यमातून विविध गावामध्ये कृषि ड्रोन चे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच या कालावधीमध्ये विविध नवीन तंत्रज्ञानाची प्रात्याक्षिके शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर देण्यात आली.
सदर अभियानामध्ये श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक व इतर तज्ञ, नियासम बारामती चे शास्त्रज्ञ डॉ. डी. बी. नांगरे व डॉ. सुशील चांगण, जामखेड तालुका कृषि अधिकारी आर. एम. घुले व कृषि विभागाचे अधिकारी सुरेश कटके, प्रफुल्ल पाटील, जनार्दन सरोदे, रावसाहेब डमरे, श्यामराव आडसूळ, भाऊराव वाघमारे, आर. के. शिंदे, शोभा जाधव, एन. बी. शिंदे, सुधीर माने, सोनवणे, जीवन हंगे, विजय निगुडे, सतीश चव्हाण, सागर बोलभट, सागर ढिसले, आत्मा चे तुषार गोलेकर, गणेश वारे यांनी सहभाग घेतला. तसेच या अभियानामधील १२ गावातील सरपंचश्री. – रघुनाथ परकड, चंद्रकांत उगले, सर्जेराव पाटील, सौ. उटेकर, बाळासाहेब वराट, सौ. छाया कवादे, सौ. कोमल जायभाय, विश्वनाथ राऊत, बळीराम शिंदे, बाळासाहेब खैरे यांनी अभियानात सामील होऊन तंत्रज्ञान व योजनांबद्दल माहिती घेतली. तसेच प्रगतशील शेतकरी जयराम खामकर, चंद्रशेखर घोलप, नानासाहेब तनपुरे, बालाजी वनवे, रामभाऊ वराट, राजू पठाण, हनुमान जाधव, विजय जायभाय, बाळू जायभाय, अशोक पोपळे, रज्जाक शेख तसेच महिला शेतकरी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झाले. श्री कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने द्वारा कार्यक्षेत्रातील ७ तालुके जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, नगर, पाथर्डी, शेवगाव व नेवासा मधील एकूण ९० गावांमध्ये विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रत्येक गावांमध्ये कृषि रथ जाणार असून शास्त्रज्ञ व अधिकारी शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत. या अभियानामध्ये जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभाग नोंदवून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाचा व शासकीय योजना विषयी माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने च्या वतीने करण्यात येत आहे.