मौजमजा आणि आनंदाने साजरा केला गरिब मुलांनी बालदिन
मौजमजा आणि आनंदाने साजरा केला गरिब मुलांनी बालदिन
स्नेहबंध’मुळे चिमुकल्यांनी प्रथमच अनुभवला बालदिन
जिल्हा प्रतिनिधी : महेश चव्हाण
अहिल्यानगर दि / 14 / कधीच खेळायला न मिळणारा फुगा त्यांनी कदाचित पहिल्यांदा अनुभवला. त्यात चॉकलेट, बिस्किट मिळाल्याने त्यांच्या आनंद गगनात मावेना. हुर्ये… हुर्ये… करत ही मुले भारावून गेली. आपण खूप काहीतरी भारी केले आहे, हे त्यांच्या डोळ्यांत दिसत होते. निमित्त होते सावेडी येथील रासनेनगर भागात गरीब मुलांसोबत साजरा झालेल्या बालदिनाचे.
स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या संकल्पनेतून हा बालदिन रासनेनगर भागातील पालामध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांच्या मुलांसोबत साजरा करण्यात आला.
१४ नोव्हेंबर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती किंवा बालदिन म्हणून ओळखली जाते. हा संपूर्ण दिवस मुलांना समर्पित आहे. मात्र पालात राहणाऱ्या या गरीब मुलांना कसला बालदिन. त्यांना सर्व दिवस सारखेच असतात. मात्र त्यांचाही बालदिन मौजमजा आणि आनंदाने साजरा व्हावा या उद्देशाने स्नेहबंधने त्यांच्यात जाऊन बालदिन साजरा केला. या मुलांना फुगे, चॉकलेट, बिस्किट पुडे देण्यात आली. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. त्यांनी फुगे हवेत उडवली, यावेळी त्यांच्या निरागस हास्याने या परिसरातील वातावरण खुलून गेले होते. आपल्या आयुष्यात या मुलांनी प्रथमच बालदिन अनुभवला. याबद्दल त्यांच्या पालकांनी स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे व त्यांचे सहकारी निशांत पानसरे, हेमंत ढाकेफळकर आभार मानले.
मुलांना बालपण देताना, आपणही ते पुन्हा एकदा अनुभवतो
मुलांना बालपण खऱ्या अर्थाने अनुभवता यावे, लहान वयाचेच अनुभव त्यांना घेता यावेत, यासाठी प्रयत्न करणे म्हणजे बालदिन. आजच्या काळात त्याची अशीच व्याख्या करावी लागेल. गरीब मुलांना हे बालपण मिळवून देण्याची जबाबदारी सामाजिक संघटनांचीही आहे.
मुलांना बालपण देताना, आपणही ते पुन्हा एकदा अनुभवू शकतो.
डॉ. उद्धव शिंदे, अध्यक्ष, स्नेहबंध फौंडेशन