राहुरीत पत्रकार दिनानिमित्त पोलीस ठाणे, तहसील कार्यालय व नगरपरिषद यांच्यावतीने पत्रकारांचा सन्मान
पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ, त्यांचा सन्मान करणे प्रशासनचे कर्तव्य- संजय ठेंगे
राहुरीत पत्रकार दिनानिमित्त पोलीस ठाणे, तहसील कार्यालय व नगरपरिषद यांच्यावतीने पत्रकारांचा सन्मान
पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ, त्यांचा सन्मान करणे प्रशासनचे कर्तव्य- संजय ठेंगे
राहुरी वृत्तसेवा / जावेद शेख
राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे पत्रकार दिनानिमित्त पोलीस ठाणे, तहसील कार्यालय व नगरपरिषद यांच्यावतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी व्यासपिठावर तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे तसेच ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार पाटील बोलताना म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्यांचे योगदान सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक बाबतीत फार मोठे आहे. प्रशासन आणि पत्रकार हे जनतेत एक दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या समस्या मांडण्याचे काम पत्रकार करीत असतात. जनतेच्या समस्या पत्रकारांच्या माध्यमातून प्रशासनाकडे पोहचतात. एक रक्षात्मक व सकारात्मक काम पत्रकार करीत असल्याने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले की भारतीय लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे. त्या स्तंभाचा सन्मान करणे हे प्रशासनचे कर्तव्य आहे.राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी समाजातील समस्यांना वाचा फोडून न्याय देण्याचे काम केले आहे. राहुरी तालुक्यातील पत्रकार हा नेहमी सतर्क राहून समाजातील सर्व घटनांवर लक्ष ठेऊन समाजाला न्याय देण्याचे काम करतो. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे म्हणाले, त्याकाळात बाळशास्त्री जांभेकर हे प्रत्येक बातमी ही मराठी व इंग्रजी भाषेत त्यांच्या दर्पण वृत्तपत्रात छापत असत. त्यामुळे इंग्रज राजवटीलाही जनतेच्या समस्या समजत व जनतेलाही आपल्या समस्या मांडल्याचे समजत असे. त्यामुळे त्याकाळात वृत्तपत्र हे इंग्रज सरकार व जनता यांच्यातील दुवा होते. कार्यक्रमास उपस्थित राहील्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकारांनी पूर्वीची व आत्ताची पत्रकारीता यामधील फरक विषद करून पत्रकारांच्या व्यथा मांडल्या. रफिक शेख यांनी पत्रकारांच्या व्यथा मांडून त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी तालुक्यातून जवळपास शेकडोच्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी जाधव यांनी केले व आभार विलास कुलकर्णी यांनी मानले.