राहुरी तालुक्यात वडनेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू
मंत्र्यांच्या बंगल्यात बिबटे सोडावे लागतील; आ.तनपुरे

राहुरी तालुक्यात वडनेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू
मंत्र्यांच्या बंगल्यात बिबटे सोडावे लागतील; आ.तनपुरे
राहुरी वृत्तसेवा : जावेद शेख
राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वडनेर येथिल बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने माजी मंत्री व आ.प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत चार वेळा प्रश्न मांडून त्याची दखल घेतली जात नसेल तर मंत्यांच्या बंगल्यात बिबटे सोडावे लागतील अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
वडनेर शिवारातील गव्हाणे वस्ती येथील शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणे उर्फ बोजी हे आज सोमवारी पहाटे ४ वाजेदरम्यान मकाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात गव्हाणे हे जागेवर ठार झाले आहे. सकाळी घरातील सदस्य शेतातून शोभचंद गव्हाणे घरी का परतले नाही हे पाण्यासाठी गेले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्यासह वनविभाग कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे वडनेर परिसरात शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे.पोलीस व वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मयत शोभचंद गव्हाणे यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा मोठा परिवार आहे. ते वडनेर सोसायटीचे चेअरमन किरण गव्हाणे यांचे ते चुलते होत. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बिबट्याने मानवी हल्ला केल्याने तो पुन्हा गावाजवळ येण्याची भीती ग्रामस्थांना वाटत असल्याने वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.