वनस्पतींच्या वाढीमध्ये जिवाणूंची कामगिरी महत्त्वाची:- श्री. शरद विसपुते यांचे प्रतिपादन

वनस्पतींच्या वाढीमध्ये जिवाणूंची कामगिरी महत्त्वाची:- श्री. शरद विसपुते यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ३०/ कोणत्याही वनस्पतीच्या वाढ, विकास व उत्पादन या प्रक्रियेमध्ये जिवाणूंची कामगिरी अतिशय महत्त्वाची असते, परंतु याकडे शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष झाल्यामुळे शेतीला भरमसाठ रासायनिक खते घालूनही उत्पादनाची टक्केवारी मात्र घटत आहे. या पाठीमागील शास्त्र समजून घेण्यासाठी जीवाणूंची साखळी समजून घेणे महत्त्वाचे आहे. वनस्पतीला अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचे काम हे जीवनमार्फत होत असते. सेंद्रिय कर्ब हे जिवाणूंचे खाद्य आहे. त्यामुळेच जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या वाढवण्यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले पाहिजे आणि त्यासाठी जमिनीमध्ये पालापाचोळा, काडीकचरा याबरोबरच सेंद्रिय खत, गांडूळ खत हे घातले गेले असे प्रतिपादन श्री शरद विसपुते यांनी केले. सकाळ ॲग्रोवन, ॲग्री सर्च व राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने “केळी पीक व खरीप हंगाम पूर्व तयारी” या विषयावर आज दि. 30 मे 2026 रोजी करमाळा – कुर्डूवाडी रोड, बेंद फाटा येथे आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
या परिसंवादाला परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. कार्यक्रमामध्ये केळी पीक व्यवस्थापन, निर्यातक्षम उत्पादन, कीड व रोग नियंत्रण तसेच नैसर्गिक शेती या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्री. किरण पाटील (जैन इरिगेशन, जळगाव) यांनी “निर्यातक्षम केळी व्यवस्थापन” या विषयावर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. यावेळी डॉ. घनश्याम पेटकर (वनस्पती रोग शास्त्रज्ञ, टेंभुर्णी) यांनी “एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन” या विषयावर सविस्तर माहिती देत योग्य वेळी नियंत्रण उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विकास वीर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बिबीशन मस्कर यांनी केले तर आभार ॲग्री सर्च कंपनीचे श्री राहुल पाटील यांनी मानले.
या सुविधा राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीत मिळतात:-
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने कंपनीने दहा ड्रम युनिट, गांडूळ बेड युनिट ही जैविक निविष्ट तयार करणारे युनिट सुरू केले असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन साठी वावर या कंपनीच्या माध्यमातून चिकट सापळे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. डॉ. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे तुरीचे गोदावरी वाण व बायोमिक्स, राहुरी कृषी विद्यापीठाचे बीज प्रक्रिया साठी लागणारे साहित्य आदी बाबी उपलब्ध करून दिल्यामुळे तालुक्यात विषमुक्त शेतीची चळवळ जोमाने वाढत आहे.


