ज्यांना साधी दहिगाव योजना चालवता येईना ते कारखाना काय चालवणार?:- विलासकाका राऊत यांचा विरोधकांना मार्मिक टोला

ज्यांना साधी दहिगाव योजना चालवता येईना ते कारखाना काय चालवणार?:- विलासकाका राऊत यांचा विरोधकांना मार्मिक टोला
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ११/ करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे सध्या उन्हाळी आवर्तन सुरू असून या आवर्तनाचे पाणी अजूनही टेल भागामध्ये पोहोचले नाही. पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार पाणी टेल टू हेड या पद्धतीने दिले जाते. विद्यमान लोकप्रतिनिधींनी या योजनेचा बोजवारा उडवला असून योजना सुरू होऊन ३ आठवडे झाले तरीसुद्धा अजून घोटी या गावासह इतर पंचक्रोशीतील गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आमदारासह त्यांच्या कुटुंबातील २-३ व्यक्ती कॅनॉलवर फिरूनही त्यांना साधी दहिगाव योजना चालवता येत नाही. १० पंप असलेली योजना जर यांना चालवता येत नसेल तर अशा लोकांच्या हातात कारखाना गेल्यानंतर ते कारखाना काय चालवणार ? असा मार्मिक टोला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काका राऊत यांनी पाटील गटाला लगावला आहे.
याविषयी बोलताना ते म्हणाले की, गेल्या पंचवार्षिकमध्ये प्रत्येक वर्षी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी दिले जात होते. त्यामुळे उन्हाळी आवर्तन 100 दिवस चालवले जायचे. या सातत्यपूर्ण पाण्यामुळे दहिगाव पट्ट्यातील शेतकऱ्यांचा विश्वास या योजनेवर बसला आणि या शेतकऱ्यांनी पाईपलाईन, शेततळी हे करण्याबरोबरच केळी आणि तरकारी, फळबाग, ऊस अशी बारमाही पिकांसाठी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आणि तसे उत्पन्नही या शेतकऱ्यांना मिळाले, परंतु नारायण पाटलाच्या या नियोजन शून्य कारभाराचा फटका 24 गावातील शेतकऱ्यांना बसणार असून प्रत्यक्ष या शेतकऱ्यांच्या पिकांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
दहिगाव च्या पाण्यासाठी 15 तारखेला रस्ता रोको होणार… . .
टेल भागाला पाणी मिळावे यासाठी सरपंच रवींद्र वळेकर यांच्या नेतृत्वाखाली 7 एप्रिल रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते, परंतु अद्यापही टेल भागामध्ये पाणी पोहोचलेले नाही. लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वेटीस धरणाचे काम करत आहेत, त्यामुळे 14 एप्रिल पर्यंत टेल भागात पाणी न पोहोचल्यास 15 तारखेला रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा विलास काका राऊत यांनी दिला आहे. संबंधित आंदोलनाचे निवेदन तहसील, पोलीस स्टेशन व पाटबंधारे विभाग यांना देण्यात आले आहे.