योग्य दिशा निवडूनच करिअर करा- अजित पवार

योग्य दिशा निवडूनच करिअर करा- अजित पवार
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
मुलांच्या आवडत्या क्षेत्रात त्यांना करिअर करण्याची संधी पालकांनी देणे गरजेचे आहे.त्यांच्याशी मैत्रीचे नाते ठेवून मुलांना उभारी देणे आवश्यक आहे. आताची पिढी ही हुशार असून तंत्रज्ञानाचे ज्ञानही चांगले आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थी महत्वाच्या टप्प्यावर आहेत. त्यामुळे दिशा चुकली तर, जीवन भरकटू शकते. विद्यार्थ्यांनी योग्य दिशा निवडून करिअर करावे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी केले.
रायगड जिल्हा फोटोग्राफर्स ॲन्ड व्हिडोओग्राफर्स असोसिएशन संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन व अश्वीनी टीचर्स क्लासेस अलिबाग यांच्या संयुक्त विदयमाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी (दि.14) अलिबागमधील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. सचिन राऊळ, अश्वीनी टीचर्स क्लासेसच्या संचालिका अश्वीनी मेहता, रायगड जिल्हा फोटोग्राफर्स ॲन्ड व्हीडीओग्राफर्सचे संस्थापक अध्यक्ष विवेक सुभेकर, उपाध्यक्ष समीर मालोदे, खजीनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, उपाध्यक्ष राकेश दर्पे, खजिनदार विवेक पाटील, कार्याध्यक्ष सुदेश माळी, सल्लागार सचिन म्हात्रे, सह खजिनदार प्रणेश म्हात्रे, अमर मढवी, विराज घरत, विजय पाटील, संदेश कवळे, वैभव शिंदे, जयराज वाघमारे, गणेश जाधव, मनोज पाटील, रवी गुंड, सुमित मालोदे, अभिजित काटकर, हरी देशमुख सर सर्व पदाधिकारी, सभासद, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
याप्रसंगी अजित पवार म्हणाले की, भारत देशामध्ये 42 टक्के तरुण आहेत. त्यामुळे तरुणांचा देश म्हणून आपल्या देशाला ओळखले जाते. आजची पिढीही हुशार आहे, असे कौतूक करीत पवार पुढे म्हणाले, सातत्य राखून 15 वर्ष सामाजिक उपक्रम राबविणे सोपी गोष्ट नाही. विद्यार्थ्यांना उभारी देण्याबरोबरच आनंद देणे आणि कौतुकाची थाप म्हणून फोटोग्राफर्स असोसिएशनच्या माध्यमातून चांगला उपक्रम हाती घेतला आहे. फोटोग्राफीचा व्यवसाय सांभाळत असताना सामाजिक भान ठेवून फोटोग्राफर काम करतात. फोटोग्राफर हा समाजातील अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांनी टायपिंग, संगणकीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबरच वाचनाबरोबरच खेळणे व्यायाम करण्याची देखील आवड असणे आवश्यक आहे, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी सांगितले.
—————
भुलभुलय्यांना बळी पडू नका-
आपल्याला करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे आहे, याचे नियोजन पाचवीपासूनच करणे गरजेचे आहे. दहावी, बारावी झाल्यावर कोणत्या क्षेत्रात जायचे असा गोंधळ कामयच होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन घेऊनच करिअरचा शोध घेणे आवश्यक आहे. पालकांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला पाहिजे. त्यांचे मित्र बनले पाहिजे. शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्राचे ज्ञान घेणे गरजेचे आहे. कोणत्याही भुलभुलय्यांना बळी पडू नका असा मोलाचा संदेश रायगड जिल्हा फोटोग्राफर्स ॲन्ड व्हीडीओग्राफर्सचे संस्थापक विवेक सुभेकर यांनी दिला.
—————-
विद्यार्थ्यांचा गुणगौरव
दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेले आणि दहावीमध्ये प्रथम आलेले आणि बारावी उतीर्ण झालेले अश्वीनी टीचर्स क्लासेसमधील गुणवंत विद्यार्थ्यांसह अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. प्रमाणपत्र, रोपटे व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. खेलो इंडिया अंतर्गत झालेल्या गतका मार्शल आर्ट क्रिडा प्रकारात अलिबाग तालुक्यातील महाजने येथील श्रमिका श्रीधर पाटील हीने रौप्य पदक मिळवून तालुका, जिल्हयाचे नाव लौकीक केल्याबद्दल तसेच पोलीस पाटील विकास पाटील यांची रायगड जिल्हापोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल या कर्तृत्ववान व्यक्तींचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.