Breaking
ब्रेकिंग

बोरगाव (करमाळा) येथे शेतकऱ्यांचा संयम सुटला; सबस्टेशनला वेढा, शंभूराजे जगताप यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

0 7 9 7 8 7

बोरगाव (करमाळा) येथे शेतकऱ्यांचा संयम सुटला; सबस्टेशनला वेढा, शंभूराजे जगताप यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

​करमाळा (विशेष प्रतिनिधी : सचिन जव्हेरी)

वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेत आधीच पाणी आणि विजेच्या गंभीर प्रश्नाने होरपळणाऱ्या करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अखेर अंत झाला. विजेची कपात ८ तासांवरून थेट ६ तासांवर आणल्याने आणि त्यातच गेल्या ५ दिवसांपासून वीज गायब असल्याने संतप्त झालेल्या बोरगावच्या ग्रामस्थांनी, महिला व लहान मुलांसह पोटेगाव-बोरगाव हद्दीवरील सबस्टेशनला चहूबाजूंनी वेढा घातला. यामुळे अधिकारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांनी मध्यस्थी करत यातून मार्ग काढला.
​पाच दिवसांपासून गाव अंधारात; संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर
​बोरगाव हे नदीकाठचे गाव असून, गेल्या वर्षी झालेल्या पूरपरिस्थितीमुळे येथील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाळ्यात महावितरणने (MSEDCL) वीज कपातीचे सत्र सुरू केले आहे. दोन ते तीन दिवस ‘मेंटेनन्स’च्या नावाखाली वीज बंद ठेवण्यात येत असल्याने पिके करपून चालली आहेत. या त्रासाला कंटाळून संपूर्ण गावाने सबस्टेशनवर धडक दिली.
​अतिभार (Load) आणि रखडलेले टेंडर आले समोर
​आंदोलनाची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महावितरणच्या ज्युनियर इंजिनिअरशी थेट चर्चा केली. या चर्चेदरम्यान, सबस्टेशनवर अतिरिक्त लोड असल्याने नवीन ‘लिंकिंग लाईन’ मंजूर झाली आहे, मात्र योग्य पाठपुराव्याअभावी त्याचे टेंडर रखडल्याचे समोर आले.

​शंभूराजे जगताप यांनी तात्काळ बार्शी येथील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर कुराडे साहेब यांच्याशी फोनवरून संपर्क साधून हे काम प्रथम प्राधान्याने (Priority) मार्गी लावण्याची मागणी केली.

​”अशा तीव्र उन्हाळ्यात वीज आणि पाण्याअभावी शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे. सर्व गावपुढारी आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून हा प्रश्न कायमचा सोडवावा.”
— शंभूराजे जगताप (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती)

​…तर बार्शी कार्यालयावर थेट धडक देणार: शेतकऱ्यांचा इशारा :

​सुमारे दोन तास चाललेल्या या तीव्र आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी तात्पुरता मार्ग काढत गावची वीज पूर्ववत सुरू केली. मात्र, नवीन लिंकिंग लाईनचे काम चालू आठवड्यात सुरू झाले नाही, तर सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट बार्शी येथील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा शंभूराजे जगताप आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

​आंदोलनात यांची होती उपस्थिती:

या आंदोलनात सरपंच दीपक भोज, अजित शिंदे, प्रमोद गायकवाड, विनय ननवरे, विशाल शिंदे, अक्षय शिंदे, अक्षय घाडगे, जयसिंग घाडगे, विजय शिंदे, दत्ता म्हस्के, अण्णा म्हस्के, अशोक पाटील, संजय शिंदे यांच्यासह बोरगावचे शेकडो महिला व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​आता प्रश्न उरतो की, आधीच पुराच्या तडाख्यातून सावरणाऱ्या या नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी वेळीच जागे होणार का?

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 7 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे