शहराच्या स्थापनादिनानिमित्त आ. संग्राम जगताप यांना तिरंगा फोटो फ्रेम भेट

शहराच्या स्थापनादिनानिमित्त आ. संग्राम जगताप यांना तिरंगा फोटो फ्रेम भेट
स्नेहबंध सोशल फौंडेशनचा उपक्रम
अहिल्यानगर – शहराला सांस्कृतीक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहराचा बुधवारी ५३६ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना किल्ल्याजवळ असलेल्या सर्वात मोठा तिरंगा ध्वजाची फोटो फ्रेम स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाशहराध्यक्ष अमित खामकर उपस्थित होते. स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून शहर स्थापनादिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, निजामशाहीचा संस्थापक अहमदनिजामशहा याने २८ मे १४९० मध्ये सीना नदीकाठी अहमदनगर शहराची स्थापना केली होती. निजामशाहीच्या काळात अहमदनगर दक्षिण भारताचं मुख्य प्रवेशद्वार मानले जायचं. तेव्हा आजचा दोन तृतियांश महाराष्ट्र निजामशाहीच्या ताब्यात होता. येथील स्थापत्य कला आणि जलव्यवस्थापनही विशेष प्रसिद्ध होते, असे डॉ. शिंदे म्हणाले.
स्नेहबंधच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनाही ही फोटो फ्रेम भेट देण्यात आली.
शहराला पूर्वीचे वैभव मिळावे : डॉ. उद्धव शिंदे
खापरी नळ योजना, जलमहाल आणि कारंजी हे एकेकाळी या शहराचं वैभव होतं. काळाच्या ओघात हे जलवैभव लोप पावले असले तरी त्याच्या खाणाखुणा अजूनही कुठेतरी दिसतात. शहराच्या पूर्वेला दहा किलोमीटरवर नगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर अष्टकोनी चांदबिबी महाल आहे. एकेकाळी उद्यानं, तलाव, कालवे आणि कारंजांसाठी हे शहर प्रसिद्ध होते. ते वैभव या शहराला मिळावे, अशी अपेक्षा डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.