घरेलू महिला कामगार कार्यशाळा संपन्न ; “युवाग्राम विकास संस्थेचा उपक्रम”

घरेलू महिला कामगार कार्यशाळा संपन्न ; “युवाग्राम विकास संस्थेचा उपक्रम”
राहुरी तालुका जावेद शेख
युवाग्राम विकास संस्था व कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्रीरामपूर येथे ‘घरेलू महिला कामगार संघटना कार्यशाळा’ घेण्यात आली.कार्यशाळेचे श्रीरामपूर येथे उद्दघाटन करताना स्नेहालय संस्थेच्या बालभवन प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख बोलत होते.
घरकामगार हे समाजातील एका मोठ्या उत्पादक वर्गाला सेवा पुरवतात. या प्रक्रियेत त्यांना जगण्यासाठी उत्पन्न मिळते. असंघटित क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा वर्ग असलेल्या घरकामगार महिलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या प्रचंड समस्या, कामाच्या ठिकाणी असुरक्षितता, कामाची अनिश्चितता आणि अत्यल्प वेतन अशा अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या घरकामगार स्त्रिया आजही सामाजिक सुरक्षा पासून वंचित आहेत.त्यासाठी युवाग्राम विकास संस्था गेल्या दोन वर्षापासून सातत्याने मजबुतीने कार्यरत आहे.त्यांचा कामाला आमचे सहकार्य व पाठबळ राहील असे प्रतिपादन हनीफ शेख यांनी केले.
अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार राजेद्रं वाडेकर होते. याप्रसंगी युवाग्राम संस्थेचे अध्यक्ष संभाजी पवार,संचालक फिरोज शेख,अमोल सोनवणे,शायिस्ता शेख,अनिता शेलार,आदित्य पवार आदि सह मान्यवर ऊपस्थित होते.
यावेळी बोलताना युवाग्रामचे अध्यक्ष संभाजी पवार म्हणाले की,कोणतेही काम श्रेष्ठ दर्जाचे किंवा हलक्या प्रतीचे नसून, सर्व समान व एकमेकास पूरक आहे.हे जरी खरे असले तरी घरकाम करणाऱ्या घरेलू कामगार महिलांना समाजात फारच उपेक्षेने वागवले जाते. या महिलांचा व ते करत असलेल्या कामाचे आजही सन्मान होताना दिसत नाही. घरकामगार करणाऱ्या महिलांचे काम हे अंग मेहनतीचे काम आहे. तरीही त्यांना त्यांच्या कामाचा व इतर वरच्या अतिरिक्त कामाचा योग्य मोबदला दिला जात नाही. कमी वेतनात या महिलांकडून जास्त श्रम करून घेतले जाते. या विरोधात आवाज उठवला तर मालकीण आपल्याला कामावरून काढून टाकेल,याची सतत मनात भीती असते.दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या घरेलू कामगार महिला असंघटित क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांच्यात एकजूट नाही.एकजूट नसल्यामुळे ते आपल्या हक्काविषयी आणि अधिकाराविषयी जागृत नाही.
त्यामुळे “ज्यांचे प्रश्न… त्यांचे नेतृत्व आणि त्यांचाच आवाज” या मुद्द्याला घेऊन संघटनात्मक बांधणी केली तर प्रश्न सुटण्यास मदत होईल,असे संभाजी पवार यांनी स्पष्ट केले.घरेलू कामगाराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे यावेळी स्वागत करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना जेष्ठ पत्रकार राजेद्रं वाडेकर म्हणाले की,घरकामगार कोणाचे उपकार घेत नाहीत. तर तेही श्रमिक आहेत. त्यांचा आदर त्यांच्या हक्काचे रक्षण आणि त्यांच्या जीवनमानाचा विकास हा समाजाचा आणि शासनाचा दोघांच्या जबाबदारीचा भाग आहे.युवाग्राम संस्थेच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी मुलांच्या शिक्षणाचे महत्व सांगून,प्रशिक्षण घेऊन प्रगती करण्याचे महिलांना आवाहन केले.
पाहुण्याचे स्वागत शायिस्ता शेख,तर आभार अनिता शेलार यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमोल सोनवणे यांनी केले.