कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची राहुरी ते पंढरपूर सायकल वरून -कृषी तंत्रज्ञान प्रबोधन वारी

कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची राहुरी ते पंढरपूर सायकल वरून -कृषी तंत्रज्ञान प्रबोधन वारी
राहुरी तालुका जावेद शेख
कृषी पंढरी ते श्री विठ्ठल पंढरी कृषी तंत्रज्ञान प्रबोधन वारी हा प्रबोधन पर उपक्रम विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सुरू केला आहे. कृषी तंत्रज्ञान विस्ताराचा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमामुळे कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार होत असल्याचे प्रतिपादन संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील शास्त्रज्ञ तसेच कर्मचारी यांच्या कृषी तंत्रज्ञान प्रबोधन वारी असा आशय असलेली राहुरी ते पंढरपूर या सायकलवारीचे प्रस्थान झाले. या सायकल वारीला शुभेच्छा देताना डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड यांनी या शास्त्रज्ञांच्या कृषी तंत्रज्ञान प्रबोधन वारीला शुभेच्छा दिल्या. या सायकलवारीत कृषी शक्ती व यंत्रे विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, विद्यापीठाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. सुनील फुलसावंगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र निमसे,पदुत्तर महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी डॉ. बाबासाहेब भिंगारदे,दत्ता कदम, प्रणव पावसे, श्री. रवींद्र हरिचंद्रे व श्रीश नलावडे यांचा या वारीमध्ये समावेश आहे. या कृषी तंत्रज्ञान प्रबोधन वारी दरम्यान शास्त्रज्ञांनी कृषी महाविद्यालय, मिरजगाव येथे विद्यार्थ्यांना आणि माहिजळगाव व करमाळा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कृषी तंत्रज्ञान प्रबोधन वारीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी सायकल वारीत सहभागी शास्त्रज्ञांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. या कृषी तंत्रज्ञान प्रबोधन वारी दरम्यान त्यांनी शेतीविषयक तंत्रज्ञानाचा प्रसार केला आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात दिला व सन्माननीय पंतप्रधान यांचे फिट इंडिया मूव्हमेंटचा प्रचार केला. शास्त्रज्ञांच्या या सायकलवारीचे शेतकरी व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कौतुक होत आहे.