पीएनपी चषकातून दर्जेदार खेळाडू तयार होतील माजी खा. राजू शेट्टी
पीएनपी चषकातून दर्जेदार खेळाडू तयार होतील माजी खा. राजू शेट्टी
अलिबाग | प्रतिनिधी | राजेश बाष्टे
पीएनपी चषकाची भव्यता बघून नृपाल पाटील व चित्रलेखा पाटील यांचे खूप कौतुक करावेसे वाटते. रायगड जिल्ह्याच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे, त्याच स्व. प्रभाकर पाटील यांच्या चळवळीच्या विचारांची प्रतारणा न करता पुढची पिढी काम करीत असल्याचे बघून खूप अभिमान वाटला. पीएनपी चषकाचे भव्यदिव्य स्वरुप बघून या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील, यात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले.
कुरुळ येथील आझाद मैदानात बुधवारी (दि.19) आयोजित केलेल्या पीएनपी चषकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य चिटणीस मंडळाचे खजिनदार अतुल म्हात्रे, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, पीएनपी चषकाचे आयोजक नृपाल पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, ॲड. राजन पाटील, शैला पाटील, सौरभ शेट्टी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ॲड. गौतम पाटील, पं.स. माजी सभापती सुरेश पाटील, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष विजय गिदी,शेकाप तालुक चिटणीस अनिल पाटील, तुकाराम पाटील, संतोष जंगम, ॲड. संतोष म्हात्रे, ॲड. परेश देशमुख, शरद वरसोलकर, सुरेश खोत, सतिश प्रधान, अशोक प्रधान, गणेश मढवी, संजय पाटील, ॲड. प्रसाद पाटील, ॲड. सतीश नाईक, प्रकाश पाटील, अनिल पाटील, अनिल चोपडा, संजना कीर, वैशाली कुचेकर, अनिता पवार आदी मान्यवरांसह रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पनवेल, पेण, खालापूर, कर्जत, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, माणगांव, सुधागड, तळा, पोलादपूर, महाड व रोहा येथील तालुका चिटणीस, आदी सर्व मान्यवरांसह महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद,नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक, कार्यकर्ते, प्रेक्षक, संघ मालक, खेळाडू उपस्थित होते.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, पीएनपी चषकाच्या उद्घाटनप्रसंगी येण्याची संधी मिळाली. चषकाचे हे देखणे स्वरूप बघून खुपच आनंद झाला.भव्यदिव्य असा सोहळा राबविल्याने जयंत पाटील, नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील यांचा अभिमान वाटतो.
शेतकरी चळवळीमधील पुढची पिढीदेखील विचारांची प्रतारणा न करता, जनतेसाठी जे करायला पाहिजे. ते करीत आहेत, हे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. गेली 25 ते 30 वर्षे शेतकरी चळवळीत काम करीत आलो आहे या चळवळीतून जयंत पाटील यांच्याशी संपर्क आला. शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठविण्याची संधी जयंत पाटील यांच्या माध्यमातून विधान परिषदत मिळाली. शेतकरी, कार्यकर्ते यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रायगडच नव्हे, तर संपुर्ण राज्य व देशातील जयंत पाटील आधारस्तंभ होते. दुर्देवाने ते सभागृहात नाही. त्यांची जागा भविष्यात चित्रलेखा पाटील घेतील असा विश्वास आहे.
स्व. प्रभाकर पाटील तथा भाऊ आणि ॲड. दत्ता पाटील नसते तर रायगडची जडणघडण दिसली नसती. या कर्तृत्ववान व्यक्तींना घडविणारा रायगड जिल्हा आहे. शेतकरी चळवळ कशी करावी हे संपूर्ण महाराष्ट्राला रायगड जिल्ह्याने दाखवून दिले आहे. जिल्ह्यामध्ये खेळालादेखील चांगल्या पध्दतीने प्रोत्साहन मिळत आहे. अतिशय देखणे असे नियोजन केले आहे. या स्पर्धेतून भारतीय संघात खेळाडू एक दिवस नक्की दिसेल अशी विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
—————–
जयंत पाटील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील हे केवळ रायगडकरांचेच नाही तर देशातील सर्व शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी विधान परिषदेत कायम आवाज उठविला आहे. मात्र, दुर्दैवाने हा आवाज आता विधान परिषदेत घुमणार नाही. याचे प्रचंड दुःख आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.
—
टेनिस क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळेल – चित्रलेखा पाटील
स्व. प्रभाकर पाटील यांनी कायमच खेळाडूंचा सन्मान केला आहे. त्यामुळेच स्व. प्रभाकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त नृपाल पाटील यांच्या संकल्पनेतून गतवर्षी पीएनपी चषक या स्पर्धेचा यशस्वी प्रयोग केला. यावर्षी या स्पर्धेचे दुसरे पर्व आहे. यू.व्ही. स्पोर्टस्च्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. आजपर्यंत यू.व्ही. स्पोर्टस्ने भव्यदिव्य कॉम्प्लेक्स उभारले आहेत. पुढचा काळ टेनिस क्रिकेटसाठी महत्त्वाचा आहे. सिझन बॉलप्रमाणेच टेनिस क्रिकेटलाही आंतरराष्ट्रीय दर्जा मिळेल. आपल्या मातीतला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावा, यासाठी पीएनपी चषक हे व्यासपीठ आहे. आपल्या मातीतला दर्जेदार खेळाडू व्हावा, याकरिता ही स्पर्धा आयोजित केली आहे. यासाठी नृपाल पाटील यांच्या टीमसह अनेकांनी अहोरात्र मेहनत घेतली. तीन दिवसांचा खेळ पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. याच स्पर्धेतील थळमधील खेळाडू आर्यन आज आंतराराष्ट्रीय स्तरावर खेळतोय, याचा अभिमान आहे. आज स्व. प्रभाकर पाटील आपल्यामध्ये असते, तर नातवाने खेळाडूंसाठी आयोजित केलेली भव्य स्पर्धा पाहून त्यांनाही अभिमान वाटला असता. या स्पर्धेतून अनेक खेळाडू आयएसपीएलमध्ये जातील. माजी खा. राजू शेट्टी यांनी स्पर्धेची शोभा वाढवली आहे, त्याबद्दल खूप धन्यवाद, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
——-
खेळाची उंची वाढली- जयंत पाटील यांचे गौरवोद्गार . . . .
पीएनपी चषकाचे परदेशातही प्रेक्षक आहेत, हे गौरवास्पद आहे. आज अनेकजण पीएनपी चषकसोबत स्पर्धा करु पाहात आहेत, याचा अभिमान वाटतो. या स्पर्धेचा दर्जा टिकवून ठेवला पाहिजे. या स्पर्धेतून नवीन खेळाडू राज्यस्तर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतील यासाठी प्रयत्न करु. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा, शेतकऱ्यांसाठी जगणाऱ्या नेत्याने म्हणजेच माजी खा. राजू शेट्टी यांनी उपस्थिती लावली, हा पीएनपी चषक स्पर्धेचा गौरव आहे. राजू शेट्टी हे एक आक्रमक नेते आहेत. गोरगरीबांच्या, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे आहेत. त्यामुळे त्यांचा गौरव होणे गरजेचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले.
शेतकरी, कामगार व कष्टकऱ्यांचे कैवारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा भरविण्यात आली आहे.. मागील वर्षी झालेल्या क्रिकेट स्पर्धेचे राज्यभर कौतूक झाले. दर्जेदार असे क्रिकेटचे सामने झाले. क्रिकेट खेळाडूंना चांगली संधी या खेळाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न नृपाल पाटील आणि चित्रलेखा पाटील यांनी केला आहे.पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धेचे नाविन्य असे स्थान आहे. ते टीकले पाहिजे. या खेळाची उंची वाढली असून नवीन खेळाडू राज्य, राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचा आनंद आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
——————–
हजारो प्रेक्षकांसाठी सुसज्ज अशी गॅलरी
पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील, यु.व्ही स्पोर्ट्स ॲकेडमीच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन हजारहून अधिक प्रेक्षक बसतील,अशी सुसज्ज गॅलरी उभारण्यात आली आहे. महिलांनादेखील ही स्पर्धा पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून खास महिलांसाठी प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आली आहे.भव्यदिव्य असे मैदान खेळासाठी असून घरबसल्या स्पर्धा पाहण्यासाठी प्रो लिंक स्पोर्ट्स ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे.
——-
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. पीएनपी चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आगळी वेगळी मानवंदना देण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अलिबागमधील कुलाबा ढोल ताशा ध्वज पथकाच्या ढोल ताशांच्या आवाजाने परिसर दुमदुमला. तसेच भोनंग येथील जय हनुमान लाठीकाठी ग्रुपमधील सदस्यांनी मर्दानी खेळाचे प्रदर्शन केले.
————————–