
करमाळा महात्मा गांधी विद्यालयाच्या १९७५ सालच्या एस.एस.सी बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १३/ करमाळा तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालयाचा १९७५ सालच्या एस.एस.सी बॅचचा ५० वा विद्यार्थी स्नेह मेळावा ११ जून रोजी महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे ६३ माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित जमून जून्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच १९७५ च्या बॅचचे आदर्श शिक्षक आर.आर.मोरे सर, एस.पी.शिंदे सर, जाधव सर, विधाते सर, मोटे सर, सोनी मॅडम यांचा यथोचित सत्कार सन्मान करून महात्मा गांधी विद्यालय ते करमाळा शहरांच्या प्रमुख मार्गावरून सुवाद्य रॅलीचे आयोजन करून रॅली ची सांगता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ करण्यात आली. विद्यार्थी स्नेह मेळावाचे राजयोग हॉटेल येथे एकमेकांच्या भावना अर्थात अनुभव कथन म्हणजेच मनोगताचा कार्यक्रम झाला. यावेळी देहभान विसरून गाणी, अभंग, कविता, बासरी वादन यातही माजी विद्यार्थ्यांनी मनसोक्त सहभाग घेतला. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक वेगळा आनंद ओसंडून वाहत होता. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये नागेश माने, किरण यादव, सोमनाथ चिवटे, मोहन देवी, सतिश शीलवंत, भारत वांगडे, विजया कोग्रेकर – महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.