कमी कालावधी व जास्त उत्पादन देणार्या कापूस वाणांची निर्मिती व्हावी – – संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के
कमी कालावधी व जास्त उत्पादन देणार्या कापूस वाणांची निर्मिती व्हावी – – संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के
राहुरी तालुका जावेद शेख
कापूस सुधार प्रकल्पामध्ये कापूस पिकावर महत्वाचे संशोधन सुरु आहे. महाराष्ट्रात कापूस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून शेतकर्यांच्या दृष्टीने कापूस पीक महत्वाचे आहे. कापूस पीक तयार होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. या पिकामध्ये कमी कालावधीत व जास्त उत्पादन देणार्या कापूस वाणांची निर्मिती व्हावी असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात अखिल भारतीय समन्वीत कापूस सुधार प्रकल्पामध्ये जागतीक कापूस दिन व शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन डॉ. विठ्ठल शिर्के बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, नियंत्रक श्री. सदाशीव पाटील, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार, वरिष्ठ कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल व किटकशास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार भुते उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. विठ्ठल शिर्के मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की शेतकर्यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेवून विविध पिकांवरील किडी व रोगांचे व्यवस्थापन करावे त्यामुळे शेतकर्यांचा औषधांवरील खर्च कमी होईल. डॉ. गोरक्ष ससाणे यावेळी म्हणाले की मुंबईसह देशाच्या अर्थकारणात कापूस पिकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून विद्यापीठातील कापूस प्रकल्प काम करीत आहे. कापूस पिकाबद्दल जागृकता निर्माण होईल असे दिवस साजरे करणे तंत्रज्ञान प्रसारासाठी महत्वाचे कार्य होय. डॉ. साताप्पा खरबडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की कापूस सुधार प्रकल्पातील शास्त्रज्ञांनी कापूस पिकाच्या विविध वाणांची निर्मिती करून मोठे योगदान दिले आहे. या प्रकल्पाने शेतकर्यांना एकात्मिक पीक संरक्षण व्यवस्थापन हे तंत्रज्ञान दिले. विद्यापीठाने तयार केलेली जैविक कीडनाशके, सुपरबायोमिक्ससारखे उत्पादने वापरून शेतकर्यांनी कीटकनाशकांवर होणारा खर्च कमी करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी सदाशिव पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की देशाच्या औद्योगिक क्रांतीमध्ये कॉटन मिल्सचा वाटा मोठा आहे. वस्त्र ही मानवाची मूलभूत गरज असण्याबरोबरच मानवाच्या आर्थिक स्थैर्यासाठी कपाशीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. पूर्वी अखंड भारतात कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होऊन कापसाची निर्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत होती. यावेळी डॉ. विजू अमोलिक व शेतकरी प्रकाश धोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पवन कुलवाल यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कापूस, ज्युट व भुईमूग या पिकांच्या प्रात्यक्षिक प्लॉटला मान्यवर व शेतकर्यांनी भेटी दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदकुमार भुते यांनी तर आभार डॉ. नानासाहेब मरकड यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता, विविध विभागांचे विभाग प्रमुख, कापूस सुधार प्रकल्पातील सर्व शास्त्रज्ञ, कर्मचारी, विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


