मैत्रेय कंपनीचा डाव उघड; गुंतवणूकदारांची लूट आणि अन्यायाच्या कहाणीचा शेवट कधी ?
मैत्रेय कंपनीचा डाव उघड; गुंतवणूकदारांची लूट आणि अन्यायाच्या कहाणीचा शेवट कधी?
विशेष प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- दि मैत्रेय कंपनीचा २१ डिसेंबर १९९८ साली सुरू झालेला प्रवास, आज आर्थिक गुन्हेगारीचा एक भयंकर अध्याय ठरला आहे. लोकांच्या कष्टाचे पैसे आणि त्यांच्या स्वप्नांवर डल्ला मारून उभारलेल्या या साम्राज्याचा पर्दाफाश आज प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात संताप भरून जातो.
ही कंपनी लोकांना बँकेपेक्षा अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवत ठेव्या स्वीकारत होती. त्यांच्या जाळ्यात सुमारे ३८ लाखापेक्षा अधिक लोक अडकले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आणि गोव्यात मध्ये तब्बल १२० शाखा पेक्षा अधिक शाखा उघडून कंपनीने सगळ्यांचे विश्वासघाताने शोषण केले. लोकांच्या ठेवी प्लॉट विक्री, बांधकाम, शेअर बाजार, आणि हॉटेल उद्योग अशा क्षेत्रात गुंतवून कंपनीने स्वतःसाठी अमाप संपत्ती जमवली.
२०१५ पर्यंत सगळे सुरळीत होते. मात्र, कंपनीच्या अप्रामाणिक कारभारामुळे सेबीच्या चौकशीत भलेमोठे गैरप्रकार उघडकीस आले. कंपनीने नियमांचा भंग करत ठेवी स्वीकारल्या, सेबीच्या आदेशाला धुडकावले, शाखांची नावे बदलून फसवणूक सुरू ठेवली. पण शेवटी, २०१५ मध्ये सेबीने कारवाई करत कंपनीच्या मालमत्तांवर आणि बँक खात्यांवर जप्तीचा आदेश दिला.
कंपनीच्या चेअरमन वर्षा सत्पाळकर यांना अटक झाली, आणि त्यांच्यासह संचालक मंडळाविरोधात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये शेकडो गुन्हे दाखल झाले. ठेवीदारांनी केलेल्या तक्रारींवरून २६०० कोटी रुपयांचा अपहार उघडकीस आला. आज, ७-८ वर्षे झाली, तरी ठेवीदारांना आपले पैसे परत मिळालेल्या नाहीत.
न्यायालयाचा मालमत्ता विक्री आदेश – पण ठेवीदारांचा अजूनही संघर्ष कायम . . .
मुंबई सत्र न्यायालयाने ३५८ मालमत्ता विकण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील २९९ मालमत्ता आधीच मंजूर आहेत. ६ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या सुनावणीत आणखी ५९ मालमत्ता विक्रीचे आदेश मिळाले. हे काम एका खासगी कंपनीला दिले गेले आहे. पण, या प्रक्रियेचा वेग अत्यंत संथ आहे. लोकांच्या जीवाचा थरकाप उडवणाऱ्या या गैरव्यवहारावर कठोर उपाययोजना होणार का, असा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
ठेवीदारांचा संताप – आम्हाला न्याय हवा!
“आम्ही आमचा खस्ता खाऊन, काटकसरीने पैसे जमवले. स्वप्न उभे करण्यासाठी मैत्रेय कंपनीवर विश्वास ठेवला, आणि त्यांनी आम्हाला अक्षरशः फसवले,” असे म्हणत धुळे येथील पिंटू दर्डा यांनी आपला संताप व्यक्त केला. अजूनही २६०० कोटी रुपयांची परतफेड बाकी आहे. अधिकारी आणि वकील वर्गाने जलद कार्यवाही करावी, कोर्टाच्या आदेशांनुसार मालमत्ता विक्री त्वरेने व्हावी, हीच ठेवीदारांची मागणी आहे. आज लोकांच्या चेहऱ्यावर कोर्टाच्या निकालामुळे थोडा आनंद दिसतो, पण तो तात्पुरता आहे. जर मालमत्तांची विक्री लवकर झाली नाही, तर ठेवीदारांना आपले पैसे परत मिळणे आणखी लांबणीवर जाईल.
सरकार आणि प्रशासनाने !
आम्ही सरकार आणि प्रशासानाला थेट आव्हान देतो – ही प्रकरणं फक्त कागदावर चालवून चालणार नाहीत! लोकांचे कष्टाचे पैसे आणि आयुष्यभराची गुंतवणूक वाया गेली आहे. दोषींना कठोर शिक्षा देऊन आणि मालमत्तांची विक्री जलद करून ठेवीदारांना न्याय द्यावा. अन्यथा, ठेवीदारांचा राग रस्त्यावर उतरेल, आणि सरकारलाही जबाबदारीला सामोरे जावे लागेल.
मैत्रेय उपभोक्ता एवम अभिकर्ता असोसिशन, महाराष्ट्र