कामगार, कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ डॉ. बाबा आढाव : – ॲड. राहुल सावंत

कामगार, कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ डॉ. बाबा आढाव : – ॲड. राहुल सावंत
करमाळा / प्रतिनिधी : सचिन जव्हेरी
डॉ. बाबा आढाव यांच्या विचारावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रभाव असल्याने कष्टकरी कामगारांच्या घामाला न्याय मिळवून देणे, अन्यायाविरुद्ध लढा देणे, माणूस म्हणून त्यांना समाजात पत मिळवून देणे, अशा प्रकारचे सामाजिक काम दिवस-रात्र करत राहणे ही डॉ. बाबा आढाव यांचा दिनक्रम बनला आहे.
आज बाबांचा वाढदिवस.
कष्टकऱ्यांचे दैवत डॉ. बाबा आढाव यांच्या विचाराशी प्रेरित होऊन स्व. सुभाष आण्णा सावंत यांनी आपल्या करमाळा तालुक्यात हमाल पंचायत स्थापना करून माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला. स्व. सुभाष आण्णा सावंत हे डॉ. बाबा आढाव यांना आपले गुरु मानायचे. आण्णांच्या व बाबांच्या विचाराने हमाल, तोलार , कष्टकऱी कामगार यांच्यासाठी ॲड राहुल सावंत हे उल्लेखनीय काम करत आहेत.
वयाच्या ९५ व्या वर्षातही बाबा सक्रिय आहेत. तब्येतीचे गंभीर विषय असतानादेखील आंदोलनात उभे राहून सत्याग्रह करायला आणि जेलमध्ये यायला कोणकोण तयार आहे?, असा प्रश्न करताना दिसतात. कष्टकऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेचे गा-हाणे संसदेसमोर मांडण्यासाठी बाबांनी महाड ते दिल्ली सायकल यात्रा काढली होती. याचबरोबर झोपडपट्ट्या
हटवल्या जाऊ नयेत म्हणून, मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून,
‘एक गाव-एक पाणवठा’ बनावा,
धरणग्रस्तांचे न्याय्य पुनर्वसन व्हावे म्हणून सातत्याने शेतकरी, कष्टकरी यांच्यासोबत बाबा संघर्ष करत आले आहेत.
त्यांच्या काही प्रमुख सामाजिक सुधारणांमध्ये असंघटित कामगारांची कामगार संघटना हमाल पंचायत स्थापन करणे आणि डोक्यावर भार टाकणाऱ्या आणि मजुरांसाठी किमान वेतन लागू करणे, महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर हातमजूर कामगार कायदा तयार करणे आणि अंमलबजावणी करणे आणि भारतातील दलित/अस्पृश्य लोकांना ग्रामीण महाराष्ट्रात पाणी मिळावे यासाठी एक गाव, एक पाणवठा (अनुवाद एक गाव, एक तलाव ) चळवळ सुरू करणे यांचा समावेश आहे. झोपडपट्टी पुनर्वसन कायदा , धरण आणि प्रकल्प-प्रभावित पुनर्वसन कायदा आणि देवदासी पुनर्वसन कायदा यासारखे प्रगतीशील कायदे करण्यासाठी राज्य अधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्यात बाबांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या वयात सुध्दा बाबा असंघटित कामगारांसाठी मोर्चा ,उपोषण, चळवळ, आंदोलन करतात.
राष्ट्रसेवा दलाच्या बिनभिंतीच्या शाळेतून संस्कारित होऊन रचना, प्रबोधन व संघर्ष अशा सर्वच क्षेत्रांत लक्षवेधी कामे करून दाखवणारे अनेक कार्यकर्ते सापडतील. त्या सर्वांच्या अग्रभागी डॉ. बाबा आढाव यांचेच नाव आवर्जून व अभिमानाने घेता येईल. बाबांनी उभ्या केलेल्या अनेक संघटनांपैकी ‘हमाल पंचायत’, ‘कष्टाची भाकर’ हा प्रयोगसुद्धा अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मागील जवळपास पन्नास वर्षे कष्टकऱ्यांची भूक भागविण्यासाठी कष्टकऱ्यांनी चालवलेला हा प्रकल्प आहे. विशेष म्हणजे विदेशी संस्थांची अथवा देशी कंपन्यांच्या ‘सीएसआर’ फंडाची आर्थिक मदत हा प्रकल्प घेत नाही. रेशनच्या धान्याव्यतिरिक्त सरकारचीही कुठलीच मदत नाही. हा प्रकल्प जसा कष्टकऱ्यांची भूक सन्मानाने भागवण्याचे काम करतो, तसाच तो अनेक कष्टकरी महिलांना रोजगार देतो. सामाजिक कृतज्ञता निधीच्या वतीने आम्ही ‘हमाल पंचायत’, ‘कष्टाची भाकर ‘ला सामाजिक उद्योजकता पुरस्काराने नुकतेच गौरविले आहे.
रिक्षा पंचायत, टेंपो पंचायत, अपंग कष्टकरी पंचायत, कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत, हमाल-मापाडी महामंडळ अशा अनेक संघटना उभ्या करताना समाजातल्या खऱ्या अर्थाने तळागाळातल्या जनसमूहाशी म्हणजेच ‘नाही रे’ वर्गाशी इतके घट्ट नाते बाबांनी जोडले आहे की, ते आपोआपच
असंघटित कष्टकऱ्यांचे नेते आणि त्यांच्या जीवाभावाचा माणूस बनले आहेत.
‘एक गाव-एक पाणवठा’,
‘मत मिळाले; पत कुठंय?’,
‘मनू पुतळा हटाव’ अशा सामाजिक समतेच्या विविध मोहिमा बाबांनी यशस्वी राबवल्या. शोषितांची वेदना दूर करण्याचे काम समाजाच्या दया भावाच्या आधारे होऊ नये, तर ज्यांचा प्रश्न आहे त्या कष्टकऱ्यांचा स्वाभिमान जागवत, संघटित दबावातूनच माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, हा त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या कामातल्या या सच्चेपणामुळेच बाबांची भूमिका मान्य नसणारे त्यांचे विरोधकही त्यांच्याबद्दलचा आदरभाव कमी होऊ देत नाहीत. महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक विषमतेच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या १९८० च्या दशकातील सर्व गट व नेत्यांना एकत्र आणणाऱ्या विषमता निर्मूलन परिषदेसारख्या मंचाचे समर्थ नेतृत्व बाबांनी केले.
महाराष्ट्रात पूर्णवेळ कार्यकर्त्यांची कमतरता नाही; पण बदलत्या जमान्यात, वाढत्या चंगळवादी जीवनशैलीच्या प्रभावात पूर्णवेळ कार्यकर्त्यांच्या अडचणी कोण समजून घेणार? डॉ. बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोळकर, श्रीराम लागू, निळू फुले यांच्या सारख्या संवेदनशील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सामाजिक कृतज्ञता निधी स्थापन केला. गाव पातळीवर धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्याला कृतज्ञता म्हणून आर्थिक आधार देण्याची कल्पना ही अफलातूनच म्हटली पाहिजे. देश नव्हे, तर जगातील हा एकमेव प्रयोग असेल. या प्रयोगातले बाबांचे योगदानही तितकेच महत्त्वपूर्ण आहे.
आज बाबा तुमच्या वाढदिवसानिमित्त बाबा तुम्हाला तुमचा प्रत्येक वाढदिवस खूप आनंदाचा, उत्तम आरोग्य, यशाच्या दिशेकडे वाटचाल करणारा आणि खूप समृद्धी घेऊन देणारा येऊ हिच करमाळा तालुका हमाल पंचायत च्या वतीने देवाकडे प्रार्थना करतो.