वसंत साखर कारखान्यासाठी लढा उभारणार- रविकांत तुपकर*

वसंत साखर कारखान्यासाठी लढा उभारणार- रविकांत तुपकर*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- आज जळगाव जिल्ह्यातील कासोदा वनकोठे (ता. एरंडोल) येथे शेतकरी नेते श्री रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची सभा पार पडली. या परिसरातील वसंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.1976 साली स्थापन झालेला हा कारखाना 1998-99 पर्यंत सलग सुरू होता. पण नंतर तो काही नेत्यांच्या पराक्रमामुळे बंद पडला. या कारखान्यामुळे परिसरातील शेतकरी, कामगार आणि छोट्या व्यावसायिकांना एक आर्थिक आधार मिळाला होता. मात्र, आता तो बंद झाल्यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले, त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.आजच्या सभेत हे कारखान्याचे जुने वैभव नव्याने प्राप्त करण्यासाठी ताकदीने लढण्याचा निर्धार केला.या कारखान्याचे सात तालुक्यातील ४२१ गावांमध्ये तब्बल १४,००० सभासद आहेत. कारखान्याची २८२ एकर जमीन आहे. सध्या या कारखान्याकडे ४०,००० लिटर क्षमतेचा डीस्टीलरी प्लॅन्ट उभा आहे. सुमारे ७०० कामगारांचा उदरनिर्वाह या कारखान्यावर अवलंबून होता. परंतु कारखाना बंद झाल्याने हे सगळं उद्ध्वस्त झालं. अनेकांचे वय वाढले, नोकऱ्या गेल्या, कुटुंबं तुटली. या कारखान्यावर सध्या जळगाव जिल्हा बँकेचं १८ ते १९ कोटींचं मुद्दल कर्ज आहे, तर एकूण कर्ज व थकबाकी मिळून सुमारे १०० कोटींची देणी आहेत. जर सरकारने विशेष पॅकेज दिलं, तर हा कारखाना पुन्हा कार्यान्वित होऊ शकतो. त्यामुळे सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, ही आमची ठाम मागणी आहे.सरकारने याबाबत सकारात्मक पाऊल उचललं नाही, तर हा लढा आम्ही शेतकरी थेट मुंबईतच नेऊ…! असा इशारा यावेळी दिला. सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी या कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन शेतकऱ्यांनी केलं,जर कुणी नेत्यांनी या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांच्याविरोधातही आक्रमक आंदोलन उभं करू. लवकरच पुढील टप्प्याचं नियोजन जाहीर केलं जाईल. आजच्या सभेला अॅड. विश्वासराव भोसले, शिवराम काका पाटील, ‘क्रांतिकारी’ शेतकरी संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख ईश्वर पाटील (धुळे), अनिल पवार(धुळे),योगेश ठाकूर (धुळे),श्री ईश्वर बापू पाटील,पांडुरंग पाटील,संतोष पाटील, मनोज पाटील, कर्मचारी पुत्र अमोलभाऊ बडगुजर व परिसरातील शेतकरी व कर्मचारी बांधव आणि विशेषतः या लढ्याचे नेतृत्व करणारे निळकंठ पाटील सर (पाचोरा) यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. या सगळ्यांच्या एकत्रित पाठबळामुळे हा लढा अधिक जोमाने पुढे नेण्याची तयारी सुरु झाली आहे.शेवटी कार्यक्रमाचे आभार श्री अमोल बडगुजर यांनी मानले.




