Breaking
ब्रेकिंग

झुंजार आईंच्या नावे सुवर्णपदक! – स्व. गंगूआई रामजी सोळंके यांच्या नावाने सुरु झाले सुवर्णपदक

0 3 9 0 7 2

 

झुंजार आईंच्या नावे सुवर्णपदक! – स्व. गंगूआई रामजी सोळंके यांच्या नावाने सुरु झाले सुवर्णपदक

राहुरी जावेद शेख

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (जि. अहिल्यानगर) येथे होणाऱ्या ३८व्या पदवीप्रदान समारंभात एक नविन आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘स्व. गंगूआई रामजी सोळंके सुवर्णपदक’ या नावाने एक विशेष सुवर्णपदक सुरु करण्यात आले असून, प्रत्येक वर्षी कृषी विद्या विभागात ‘तण नियंत्रण’ (Weed Management) विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास हे सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.

या वर्षीची सुवर्णपदक विजेती आहे – विद्यार्थिनी अश्विनी मधुकर भोसले, जिने ‘Weed Management’ विषयात सर्वाधिक गुण मिळवले आहेत. तिचा सत्कार मा. राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन, कृषी मंत्री मा. ना. अॅड. माणिकराव कोकाटे, जलसंपदा मंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि मा. ना. अॅड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत २२ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या पदवीप्रदान समारंभात होणार आहे.

स्व. गंगूआई रामजी सोळंके (चिमणापूर, ता. कन्नड) या खर्‍या अर्थाने झुंजार आणि कष्टकरी भूमिकन्या होत्या. त्यांचा जन्म १९०३ साली नादरपूर (ता. कन्नड) येथे झाला. अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह रामजी लक्ष्मण सोळंके यांच्याशी झाला. अनेक संकटांवर मात करत, त्यांनी संपूर्ण सोळंके कुटुंब घडवले. दरोडेखोरांशी झुंज देणाऱ्या त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना ‘झुंजार आई’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

गंगूआई यांना दोन मुले होती – स्व. रघुराम रामजी सोळंके आणि विठ्ठलराव रामजी सोळंके. त्यांनी आपल्या कुटुंबात उत्तम संस्कार रुजवले. आज त्यांच्या घराण्यात १० डॉक्टर्स, २ पीएचडी, ५ अभियंते, १ चार्टर्ड अकाउंटंट, ५ पदव्युत्तर पदवीधर, ४ कृषी पदवीधर, अनेक प्रगतीशील शेतकरी आणि उद्योजक आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबात ७० पेक्षा जास्त सदस्य असून, ते विविध क्षेत्रांत यशस्वी आहेत.

या सुवर्णपदकाची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती गंगूआईंचे नातू डॉ. आनंद विठ्ठलराव सोळंके यांनी. महात्मा फुले कृषी विद्यापीठात त्यांनी कृषीविद्या विभागप्रमुख, प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) तसेच ऊस विशेषज्ञ (महाराष्ट्र राज्य), पाडेगाव जि. सातारा येथे शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच विद्यापीठाने हे सुवर्णपदक मंजूर केले. त्यांच्या या योगदानाबद्दल संपूर्ण कुटुंबाने अभिमान व्यक्त केला आहे.

हे सुवर्णपदक केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण मातांच्या त्यागाचे प्रतीक ठरणार आहे, असा विश्वास त्यांच्या परिवाराने व्यक्त केला आहे.

त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन करण्यात आलेले हे सुवर्णपदक हे कन्नड तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इतिहासातील पहिले सुवर्णपदक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी हे एक आदर्श व प्रेरणादायी पाऊल ठरेल.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे