महेश मुनोत विद्यालयात स्वरचित काव्यवाचन व तिळगुळ वाटप समारंभ संपन्न
महेश मुनोत विद्यालयात स्वरचित काव्यवाचन व तिळगुळ वाटप समारंभ संपन्न
राहुरी तालुका जावेद शेख
तालुक्यातील वांबोरी येथील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मकर संक्रांतीनिमित्त विद्यार्थ्यांचे स्वरचित काव्यवाचन तसेच तिळगुळ वाटप समारंभ उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रशालेच्या प्राचार्या शुभांगी देशपांडे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ कवयित्री तथा शब्दगंध परिषदेच्या प्रा. शर्मिला गोसावी उपस्थित होत्या.
प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक ऋषिकेश कातोरे यांनी केले. प्रशालेचे शाला समितीचे चेअरमन हेमंत मुथा यांनी मकर संक्रातीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षा व अतिथींचा परिचय संभाजी पवार यांनी करून दिला. मकर संक्रांतीची भौगोलिक,धार्मिक माहिती व यानिमित्त निसर्गात होणारे बदल याविषयी सविस्तरपणे अनिकेत पाठक यांनी माहिती दिली. शिक्षकांच्या वतीने पुष्पा परते, सुभाष होळकर,संजय जाधव, विठ्ठल वाघमारे व सुधाकर धुरंधर यांनी कविता वाचन केले. एकूण ३१ विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने काव्य वाचनात सहभाग घेतला. माझा बाप,आईचे ऋण,मुखवटे व माणसे, अकल्पित घडले, सोशल मीडिया…..इत्यादी अनेक विषयावर विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केले. विद्यार्थ्यांचे तल्लीन होऊन काव्यवाचन….. उपस्थित श्रोते…. धीरगंभीर वातावरण….. अन् शब्दांच्या नाना कळा व त्यातून उलगडत जाणारे भावविश्व….कार्यक्रमास यामुळे श्रोते व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते. शब्दगंधाच्या सदस्या प्रसिद्ध कवयित्री प्रा.शर्मिला गोसावी यांनी यावेळी अतिशय रसाळ वाणीने व मंत्रमुग्धतेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवन जगावे ….जगत रहावे….. जगता जगता जगाचे व्हावे….. या आणि त्यांच्या अनेक चारोळ्यातून त्यांनी विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणा व स्वयं अध्ययन किती महत्त्वाचे आहे;आपली मानसिक अवस्था कशाप्रकारे ऊर्जित राहील याचे अनेक दाखले देऊन विद्यार्थ्यांनी जीवनात सचोटी, कर्तव्य, आत्मनिर्भयता या त्रिसूत्रींकडे लक्ष द्यावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रशालेच्या प्राचार्या शुभांगी देशपांडे म्हणाल्या की भारतीय संस्कृती व सण यांना धार्मिक व शास्त्रीय दृष्टीकोनातून अतिशय महत्त्व आहे.विद्यार्थ्यांनी स्वतःहून जे सुचेल ते वहीत लिहीत जावे. आपले ज्ञानाचे भांडार वाढवावे व जीवनात नकारात्मकता येऊ देऊ नये. कार्यक्रमास प्रशालेचे उपप्राचार्य बाळासाहेब वाबळे, पर्यवेक्षक निलेश भालेराव, निमंत्रक केशव देशपांडे, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्रीमती ज्योत्स्ना तोडमल व मनीषा कसोटे यांनी केले तर आभार अनिल लोहकरे यांनी मानले.



