शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा मनमानी कारभार; शिक्षक त्रस्त
*शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा मनमानी कारभार; शिक्षक त्रस्त!*
*’शिक्षक भारती’चा इशारा: प्रस्ताव स्वीकारून पोहच न दिल्यास तीव्र आंदोलन*
राहुरी तालुका जावेद शेख
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांचा फुटबॉल केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘केवळ ईमेल’चे कारण पुढे करत कर्मचाऱ्यांचे हार्ड कॉपी प्रस्ताव नाकारले जात आहेत आणि अधिकृत पोहच दिली जात नाही, असा खळबळजनक आरोप ‘शिक्षक भारती’ संघटनेने केला आहे.
शिक्षक भारतीचे पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाच्या या आडमुठ्या धोरणामुळे हजारो शिक्षकांचे शालार्थ, अनुकंपा व इतर महत्त्वाचे प्रस्ताव कार्यालयातील आवक-जावक विभागातून टेबलपर्यंत पोहोचतच नाहीत. मंत्रालयाकडून आलेली महत्त्वाची पत्रेही टेबलवर जाण्यास विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे.
कायदेशीर अधिकारांवर गदा
महाराष्ट्र खासगी शाळा (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, कर्मचाऱ्याला आपल्या अर्जाची पोहच मिळण्याचा अधिकार आहे. मात्र, प्रशासनाकडून पोहच देण्यास टाळाटाळ केली जात आहे. “आम्ही पत्र व्यवहाराच्या नियमांचे पालन करतो, मात्र प्रशासनाने आमच्या कायदेशीर अधिकारांचाही आदर केला पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका महेश पाडेकर यांनी मांडली आहे.
जर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने तातडीने हार्ड कॉपी स्वीकारून पोहच देण्याची व्यवस्था न केल्यास, राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच, या कारभाराबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शिक्षण विभागातील या ‘टेबल-टू-टेबल’ होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आणि दिरंगाईच्या चौकशीची मागणीही जोर धरू लागली आहे.
आता या दडपशाहीवर शिक्षण उपसंचालक काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण शिक्षक वर्गाचे लक्ष लागले आहे. या मागणीसाठीविभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, महिला अध्यक्ष रूपालीताई बोरुडे,जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, संघटक चंद्रशेखर हासे,,दीपक फापाळे, समन्वयक शरद पवार,विजय पांडे, अमोल तळेकर,संतोष नवले,प्रवीण मालुंजकर,साई थोरात,संपत वाळके, प्रवीण काळे,सहसचिव राहुल कानवडे ,तालुका अध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, ,दिगंबर देसाई,सचिव वंदना जाधव,कल्पना चौधरी, मफीज इनामदारगणपत धुमाळ,बाबासाहेब तांबे,अकील फकीर,बाबाजी लाळगे,वैभव चोथे,,श्याम जगताप, आदी पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे



