शिक्षक भारतीचा एल्गार: ‘ऑनलाईन संचमान्यतेच्या नावाने शिक्षकांचा अतिरिक्त करण्याचा कारखाना’ बंद करा
*शिक्षक भारतीचा एल्गार: ‘ऑनलाईन संचमान्यतेच्या नावाने शिक्षकांचा अतिरिक्त करण्याचा कारखाना’ बंद करा
राहुरी तालुका जावेद शेख
महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत सध्या सुरू असलेल्या ‘ऑनलाईन संचमान्यता’ प्रक्रियेच्या विरोधात ‘शिक्षक भारती’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणताही पूर्वलिखित आदेश नसताना राबविल्या जाणाऱ्या या जाचक ऑनलाईन प्रक्रियेमुळे राज्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांचे भवितव्य टांगणीला लागले असून, शिक्षक संघटनांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.
शिक्षकांना ‘अतिरिक्त’ ठरवण्याचे कारस्थान?
शिक्षक भारतीचे अध्यक्ष जयवंत भाबड यांनी शिक्षणमंत्री आणि शिक्षण आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात धक्कादायक आरोप केले आहेत. १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निकषांमुळे वाड्या-वस्त्यांवर शिकणाऱ्या शेतकरी, कामगार आणि बहुजन समाजाचे शिक्षण धोक्यात आले आहे. विशेषतः विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिक कार्यभारात झालेली वाढ (२० वरून ४०) आणि नवीन निकषांमुळे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील हजारो शिक्षक ‘अतिरिक्त’ ठरणार आहेत.
समायोजनाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा आरोप
गेल्या १० वर्षांपासून अनेक शिक्षक समायोजनाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र शिक्षण विभागात त्याबाबत कोणतेही योग्य नियोजन नाही. उलट, समायोजन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याचा गंभीर आरोप शिक्षक भारतीच्या निवेदनात करण्यात आला आहे. सरकार ठोस उपाययोजना करण्याऐवजी जटिल अटी लादून शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याचा ‘कारखाना’ चालवत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
’ऑनलाईन’चा हट्ट सोडा, ‘ऑफलाईन’ प्रक्रिया राबवा
नीती आयोगाच्या अहवालाचा हवाला देत सरकारने शाळांच्या विलीनीकरणाचा धोरणात्मक निर्णय घेतला असला, तरी प्रत्यक्षात ही धोरणे उच्च माध्यमिक शिक्षणाची कंबर मोडणारी आहेत. त्यामुळे, ही अन्यायकारक ऑनलाईन संचमान्यता प्रक्रिया त्वरित थांबवून ती पारदर्शक ‘ऑफलाईन’ पद्धतीने करावी, अशी आग्रही मागणी शिक्षक भारतीने शासनाकडे केली आहे.
शिक्षक वर्गात असंतोष:
या धोरणामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. जर शासनाने यावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आता शिक्षण मंत्रालय यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवेदनास आमदार कपिल पाटील,राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे ,कार्याध्यक्ष सुभाष मोरे,विनाअनुदान कृती समिती राज्याध्यक्ष जयवंत भाबड, सचिव सुनील गाडगे,विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, महिला अध्यक्ष रूपालीताई बोरुडे,जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, संघटक चंद्रशेखर हासे, समन्वयक शरद पवार,विजय पांडे, अमोल तळेकर,संतोष नवले,प्रवीण मालुंजकर,साई थोरात,संपत वाळके, प्रवीण काळे,सहसचिव राहुल कानवडे ,तालुका अध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, ,दिगंबर देसाई,सचिव वंदना जाधव,कल्पना चौधरी, मफीज इनामदार,दीपक फापाळे,गणपत धुमाळ,बाबासाहेब तांबे,अकील फकीर,बाबाजी लाळगे,वैभव चोथे,,श्याम जगताप, आदी पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे


