पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार स्वामीनाथ हरवाळकर यांचा विशेष सन्मान

पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार स्वामीनाथ हरवाळकर यांचा विशेष सन्मान
अक्कलकोट / दि,२४ : पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शासन-प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार स्वामीनाथ हरवाळकर यांचा विशेष सन्मान महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय नांदी साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे .
पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील दुर्बल, वंचित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी व्यासपीठ आहे, या भूमिकेतून हरवाळकर यांनी सातत्याने पत्रकारिता केली आहे.सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विविध प्रश्नांवर त्यांनी निर्भीडपणे लिखाण करून संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, प्रशासनातील त्रुटी आणि सामाजिक विषयांना त्यांनी आपल्या पत्रकारितेतून प्राधान्य दिले.वस्तुनिष्ठ माहिती, निर्भीड मांडणी आणि जनहिताची भूमिका यामुळे त्यांच्या पत्रकारितेची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, स्वागताध्यक्ष महेश इंगळे, अध्यक्षा शैलशिल्पा जाधव आणि मान्यवर प्रतिष्ठित साहित्यिकांच्या उपस्थित २५ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता स्वामी समर्थ देवस्थानच्या कल्याणराव इंगळे सभागृहात हा शानदार सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास साहित्य संमेलन आयोजकांच्या वतीने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .


