पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाची चळवळ राबविण्याचे आवाहन : सीईओ -पल्लवी विजयवंशी
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाची चळवळ राबविण्याचे आवाहन : सीईओ -पल्लवी विजयवंशी
‘स्नेहबंध’च्या पुढाकाराने पर्यावरण संवर्धनाचा संदेश
अहिल्यानगर, प्रतिनिधी :
पर्यावरण संवर्धन व हरित अहिल्यानगरच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने छावणी परिषद कार्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी ‘स्नेहबंध’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे तसेच छावणी परिषदेचे मनोनित सदस्य वसंत राठोड, स्वच्छता निरीक्षक गणेश भोर, इंजिनीअर अशोक फुलसुंदर, माजी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके, माजी प्राचार्य एकनाथ जगताप, योग प्रशिक्षक रामचंद्र लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी म्हणाल्या, “वृक्षारोपण ही केवळ एक औपचारिकता नसून पर्यावरणाचे संवर्धन करण्याची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन केल्यास पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत होईल. अशा उपक्रमांमुळे समाजात पर्यावरणाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण होते.”
डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, “स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहिताचे उपक्रम राबविले जात आहेत. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनावरही भर देणे आवश्यक आहे. आगामी काळात अधिकाधिक वृक्षारोपण उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.”
कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.


