मृत्यूनंतरही दृष्टीदानाचा वारसा जपूया; प्रत्येक नागरिकाने नेत्रदानाचा संकल्प करावा
‘मृत्यूनंतरही दृष्टीदानाचा वारसा जपूया; प्रत्येक नागरिकाने नेत्रदानाचा संकल्प करावा’
स्नेहबंध सोशल फौंडेशनतर्फे नेत्रदान जनजागृती पोस्टरचे अनावरण
अहिल्यानगर : नेत्रदान हे मानवतेच्या सेवेसाठी केले जाणारे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याची ताकद नेत्रदानामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने नेत्रदानाचा संकल्प करून आपल्या कुटुंबीयांनाही त्याबाबत जागरूक करावे, असे आवाहन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने १० जून जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती पोस्टरचे अनावरण जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी आणि पोलीस निरीक्षक (गृह) रवींद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्नेहबंध सोशल फौंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, नेत्रदानामुळे अंधत्वाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना नवजीवन मिळू शकते. आपल्या मृत्यूनंतरही दोन व्यक्तींना दृष्टी देण्याचे भाग्य नेत्रदानातून मिळते. समाजात नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावे.
नेत्रदानाचा संकल्प हा केवळ एक फॉर्म भरण्यापुरता मर्यादित न ठेवता त्याबाबत आपल्या कुटुंबीयांना माहिती देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने नेत्रदानाचा विचार करून समाजात जनजागृती निर्माण करावी, असेही त्यांनी सांगितले.
(फोटो ओळ)
नेत्रदान जनजागृती पोस्टरचे अनावरण करताना जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे.


