संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ राबवुन कृत्रिम पाऊस पाडावा – – भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष श्री.सुधीर भद्रे
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ राबवुन कृत्रिम पाऊस पाडावा अशी मागणी माजी पंचायत समिती तथा भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष श्री .सुधीर भद्रे यांनी शासनाकडे केली आहे .महाराष्ट्रामधे यावर्षी कमी पावसाची शक्यता विविध हवामान तज्ज्ञ, हवामान अभ्यासक आणि हवामानविषयक संस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जुनच्या मध्यापर्यंत पावसाची हजेरी अद्याप लागलेली नाही . त्यामुळे संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सन 2005 मध्ये बंद केलेला “प्रकल्प वर्षा” पुन्हा सुरू करून राज्यात कृत्रिम पाऊस कार्यक्रम राबवावा .
कृत्रिम पाऊस म्हणजे वातावरणातील उपलब्ध पावसाळी ढगांमध्ये विशिष्ट पदार्थांची फवारणी करून पाऊस पडण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याची वैज्ञानिक प्रक्रिया होय. भारतातील विविध राज्यांनी याचा वापर केला आहे . विशेषतः आंध्र प्रदेशने हायग्रोस्कोपिक तंत्रज्ञानाचा वापर करून सकारात्मक परिणाम मिळाले आहेत.
कृत्रिम पाऊस प्रकल्पासाठी काही कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. मात्र दुष्काळ पडल्यास शासनाला माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व्यवस्था, जनावरांसाठी पाणी आणि चारा छावण्या, मजुरांना रोजगार हमी योजनेची कामे, जलटंचाई निवारण उपाययोजना तसेच विविध प्रशासकीय खर्चांवर शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्या ऐवजी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कृत्रिम पाऊस प्रकल्प राबविणे अधिक फायदेशीर ठरेल .
याशिवाय दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणारी पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याची समस्या, रोजगार हमी योजनांवरील वाढता ताण आणि काही ठिकाणी होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठीही कृत्रिम पाऊस हा प्रभावी पर्याय ठरू शकतो.
यासाठी महाराष्ट्र शासनाने तातडीने “प्रकल्प वर्षा” पुनरुज्जीवित करून आवश्यक रडार, विमाने, हवामान निरीक्षण यंत्रणा आणि क्लाऊड सीडिंगसाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा तातडीने उभारून कृत्रिम पाऊस पाडावा आणि शेतकरी आणि सामान्य जनतेला धीर द्यावा अशी मागणी भारतीय जनसंसदचे राज्य निमंत्रक श्री .अशोक सब्बन , सरपंच कैलास पठारे , युवानेते अशोक ढगे,वीर बहादुर प्रजापती , सुनील टाक , परदेशी , भगवान जगताप , भोसले , पोपटराव साठे व जिल्हाध्यक्ष श्री . सुधीर भद्रे यांनी मा . मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे .