प्रत्येक नवविद्यार्थ्याच्या हाती वृक्ष, मनात संस्कार आणि कलेची प्रेरणा; अगस्ती महाविद्यालयातील स्वागत समारंभ उत्साहात. .

प्रत्येक नवविद्यार्थ्याच्या हाती वृक्ष, मनात संस्कार आणि कलेची प्रेरणा; अगस्ती महाविद्यालयातील स्वागत समारंभ उत्साहात.
राहुरी तालुका / जावेद शेख
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि कला शाखेच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता अकरावीच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. वृक्षसंवर्धन, सामाजिक बांधिलकी, व्यक्तिमत्त्व विकास आणि कलागुणांना प्रोत्साहन या चार महत्त्वाच्या संकल्पनांचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.
अकोले तालुक्यातील सर्वात मोठे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखले जाणारे हे महाविद्यालय दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीचे केंद्र ठरते. यंदाही विविध शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेणाऱ्या नवविद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. विकास निमसे व प्रा.महेश पाडेकर यांच्या संकल्पनेतून प्रत्येक नवप्रवेशित विद्यार्थ्याला एक वृक्षरोप भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांनी ते आपल्या घरी लावून त्याची सेल्फी संबंधित वर्गशिक्षकांकडे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामागे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव, वृक्षसंवर्धनाची जबाबदारी आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना रुजविण्याचा उद्देश असल्याचे उपप्राचार्य प्रा.चांगदेव डोंगरे व पर्यवेक्षक विवेककुमार वाकचौरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच संस्थेचे माजी कार्यकारी विश्वस्त स्व. मधुकरराव पिचड यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. व शिक्षणतज्ञ उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांचे व्याख्यान झाले
दुसऱ्या सत्रात उपक्रमशील शिक्षक रमेश खरबस यांच्या “कला, शिक्षण आणि यशस्वी जीवन” या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “गुणपत्रिकेतील गुण विद्यार्थ्याला यशाची संधी देतात; मात्र त्याच्याकडे असलेली कला त्याला समाजात वेगळी ओळख मिळवून देते. आनंदी, आत्मविश्वासू, प्रभावी आणि नेतृत्वक्षम व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी कला जोपासली पाहिजे. कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासाचा भक्कम पाया आहे.”
अगस्ती महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या श्री. खरबस यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत, शिक्षणाबरोबर विविध कला जोपासल्यामुळे आयुष्यात संधी कशा निर्माण होतात, समाजात वेगळी ओळख कशी तयार होते आणि लोकांपर्यंत सहज कसे पोहोचता येते, याची प्रेरणादायी उदाहरणे दिली. “मोठी स्वप्ने पाहा, चांगली संगत ठेवा आणि मोबाईलवर वेळ वाया घालवण्याऐवजी स्वतःमधील कला विकसित करा,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
व्याख्यानाबरोबरच श्री. खरबस यांनी स्वरचित प्रेरणादायी कविता, समाजप्रबोधनपर कलाप्रकार, प्रभावी गायन, नाट्यअभिनय, विविध कलाकारांची हुबेहूब मिमिक्री, प्राणी-पक्ष्यांचे वास्तवदर्शी आवाज तसेच उत्स्फूर्त नृत्य सादर करून विद्यार्थ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सादरीकरणाला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्या नृत्यावेळी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत संपूर्ण सभागृह जल्लोषमय केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर होते. प्रमुख उपस्थितीत सचिव सुधाकर देशमुख,प्राचार्य डॉ. शिवाजी खेमनर, उपप्राचार्य प्रा. चांगदेव डोंगरे, पर्यवेक्षक प्रा. विवेककुमार वाकचौरे, यांच्यासह अनेक प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी कला शाखा समन्वयक प्रा. सुनील टिक्कल, स्टाफ सेक्रेटरी प्रा. मनिषा गोडसे, विद्यार्थी मंडळ चेअरमन प्रा. महेश उगले, प्रा. डॉ. नितीन आरोटे, प्रा. मोहिनी शिंदे, प्रा. ललिता घोडके, प्रा. नवले मॅडम, प्रा. रवींद्र गायकवाड, प्रा. प्रकाश देशमुख, प्रा. गोरक्ष लांडगे, प्रा. सचिन चासकर, प्रा. सुनील साबळे, प्रा. आनंद चौधरी, प्रा. मुर्तडक, प्रा. बिराजदार, प्रा. बुरके, प्रा. खाडगीर, प्रा. महेश पाडेकर, प्रा. संदीप नवले, प्रा. दीपक वाकचौरे, प्रा. आनंद देशमुख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सूचना प्रा. महेश पाडेकर, प्रास्ताविक प्रा. सुनील टिक्कल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. नितीन आरोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र गायकवाड यांनी केले.यशस्वी आयोजनासाठी मनिषा गोडसे, अंजना नवले, सात्विका शिंदे, शुभांगी शेटे,डॉ. धिवर, प्रा. जाधव, प्रा. आवारी, संगिता नवले , प्रा. सचिन चासकर, प्रा. आनंद चौधरी, प्रा. सुनील साबळे, प्रा. महेश पाडेकर यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
संपादकीय दृष्टिकोन
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी मोबाईल, सोशल मीडिया आणि आभासी जगात अधिक गुंतत चालले आहेत. अशा परिस्थितीत शिक्षणाबरोबर कला, संस्कार, पर्यावरण संवर्धन आणि व्यक्तिमत्त्व विकासाची सांगड घालणारे उपक्रम ही काळाची खरी गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले, तर तो केवळ गुणवंत विद्यार्थी न राहता संवेदनशील, जबाबदार आणि समाजासाठी प्रेरणादायी नागरिक म्हणून घडू शकतो. अगस्ती महाविद्यालयाने नवविद्यार्थ्यांच्या स्वागताला वृक्षसंवर्धन, सामाजिक जाणीव आणि कलाविकासाची जोड देत शिक्षणाचा व्यापक दृष्टिकोन समाजासमोर मांडला आहे. हा उपक्रम इतर शैक्षणिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.


