यंदा संत सखाराम महाराज यात्रोत्सवात रथ ट्रॅक्टर लावून ओढण्याचा निर्णय

यंदा संत सखाराम महाराज यात्रोत्सवात रथ ट्रॅक्टर लावून ओढण्याचा निर्णय
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर : भक्तांच्या सुरक्षेचा तसेच दर्शनाप्रति त्यांच्या भावना आणि श्रद्धांचा विचार करता यंदा संत सखाराम महाराज यात्रोत्सवात रथ ट्रॅक्टर लावून ओढण्याचा निर्णय संस्थांनने घेतला आहे. भक्तांनी व भाविकांनी सहकार्य करून लाभ घ्यावा असे आवाहन ही संस्थेने केले आहे. प्रति पंढरपूर अमळनेर मधील संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सवाला पावणे तीनशे वर्षांची परंपरा आहे. हा सर्व जाती धर्म यांना सामावून घेणारा आणि प्रत्येक घटकाला यथोचित सन्मान देऊन साजरा होणारा एकमेव उत्सव असल्याने या उत्सवातून संपूर्ण महाराष्ट्रात ऐक्याचा संदेश जात असतो. म्हणूनच दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक यात्रोत्सवाचा आनन्द लुटण्यासाठी ,वैचारिक ठेवा घेऊन जाण्यासाठी येत असतात. परंपरेप्रमाणे रथ आणि पालखी मिरवणूक सर्व समाजाला घेऊन काढल्या जातात. दोराला हात लावून रथ ओढण्याची श्रद्धा आहे.यावर्षी संस्थान ने परंपरा कायम राखत , सर्वांना पूर्वीप्रमाणेच यथोचित सन्मान देत रथ मिरवणुकीत किरकोळ बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व भाविकांच्या सुरक्षेचा ,भावनेचा आणि श्रद्धेचा विचार करून सुरुवातीला परंपरेप्रमाणे दोराने काही अंतर रथ ओढून नंतर ट्रॅक्टरने रथ ओढला जाणार आहे. यामागे प्रत्येक भाविकाला रथाला स्पर्श करून दर्शन घेता यावे , रथाला प्रदक्षिणा घालता यावी हा प्रमुख उद्देश आहे. ओढणाऱ्यांच्या गर्दीत आणि ओढताणीत धक्का बुक्की होते ,नीट दर्शन घेता येत नाही , महिलांना असुरक्षेची भावना निर्माण होते. खिसे कापू ,चेन स्नॅचिंग करणारे गैरफायदा घेतात. पोलिसांवरील ताण वाढतो , सेवेकरींवर भार पडतो. या सर्व बाबीतून सुरळीत आणि सोयीस्कर मार्ग म्हणजे लहान , मुले ,महिला ,वृद्ध , दिव्यांग प्रत्येक भक्ताला आपल्या मनाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून दर्शन घेता येईल , प्रदक्षिणा घालता येईल म्हणून रथ ट्रॅक्टरने ओढून नेला जाईल. जागेवर पुन्हा दोराने रथ स्थानावर नेण्यात येईल. तरी सर्व भाविक भक्तांनी बिनधास्त पणे रथाचे दर्शन घ्यावे , भक्तीचा व यात्रोत्सवाचा आनन्द लुटावा , सर्वांनी यासाठी सहकार्य करावे ही विनंती.यात्रोत्सवात दिला जाणारा मान सन्मान पूर्वीप्रमाणेच प्रत्येक समाजाला मिळणार आहे. त्यामुळे परंपरेत कोणताही बदल झालेला नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यावी.