कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवावे – अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे

*कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवावे – अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे*
राहुरी तालुका /जावेद शेख
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रत्येक संशोधन केंद्राने, विस्तार केंद्राने, कृषी विज्ञान केंद्राने तसेच कृषी महाविद्यालयाने शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन केलेले आहे. वेगवेगळ्या पिकांनुसार राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारा एक फोरम, विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय करता यावा म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक फोरम तसेच हायटेक एग्रीकल्चर साठी एक फोरम असे वेगवेगळे फोरम स्थापन करून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त वापर करावा तसेच जैविक घटकांचा वापर करून उत्पन्न वाढवावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती शेतकरी दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. याप्रसंगी कृषिभूषण श्री. सुरसिंगराव पवार, बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अँड.श्री पंढरीनाथ तात्या पवार, विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ उपस्थित होते.
यावेळी सहयोगी प्राध्यापक डॉ. चांगदेव वायाळ शेतकरी विकास शाश्वत शेती व आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यापीठाने वेगवेगळ्या पिकांचे 320 सुधारित व संकरित वाण विकसित केलेले आहेत. विविध पिकांवरील किडी व रोगांचे नियंत्रण खते, पाणी, तणे, सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन याबाबत 2000 पेक्षा जास्त शिफारशी शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या पिकांचे 15000 क्विंटल सुधारित व संकरित बियाणे हे विद्यापीठ तयार करत आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी 55 वेगवेगळ्या अवजारांची निर्मिती देखील या विद्यापीठाने केलेली आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित व संकरित वाणांची लागवड करून, शिफारशींचा अवलंब करून, अवजारांचा वापर करून पिकांची लागवड व व्यवस्थापन केल्यास पिकांच्या उत्पादनात निश्चितच वाढ होईल. यावेळी श्री. सुरसिंगराव पवार, श्री. पंढरीनाथ तात्या पवार, प्रगतशील शेतकरी निर्मलाताई गाढे, श्री.लखूनाना गाडे, श्री.समीर देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रगतिशील शेतकरी निर्मलाताई गाडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. सखाराम आघाव यांनी मानले. यावेळी श्री.ज्ञानेश्वर भिंगारदे, श्री. ताराचंद गाडे, श्री.बापूराव कल्हापूरे, श्री सागर कल्हापूरे, श्री. रंभाजी गावडे, श्री. सुनील कुसमुडे, श्री. जनार्दन कोहकडे, श्री. काशिनाथ धनवटे, श्री. अरुण शिरसाट, श्री. सागर कर्डिले, श्री. नितीन शिरसाठ, श्री. अरुण गागरे व इतर शेतकरी तसेच कृषी अर्थशास्त्र विभागातर्फे निवडण्यात आलेल्या सर्व गावातील संपर्क शेतकरी, सरपंच, उपसरपंच व कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



