खेत बचाओ अभियानांतर्गत डाळिंब उत्पादक शेतकर्यांना मार्गदर्शन*
*खेत बचाओ अभियानांतर्गत डाळिंब उत्पादक शेतकर्यांना मार्गदर्शन*
राहुरी तालुका जावेद शेख
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्पाच्या वतीने खेत बचाओ अभियान व संतुलित खत वापर जागरुकता अभियानांतर्गत कानडगाव, तांभेरे व चिंचविहिरे येथे डाळिंब उत्पादक शेतकर्यांच्या प्रक्षेत्रावर भेटी आयोजित करण्यात आल्या. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वाखाली तसेच संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके व उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले.
यावेळी झालेल्या तांत्रिक चर्चासत्रात प्रकल्पाचे उद्यानविद्यावेत्ता डॉ. सुभाष गायकवाड यांनी डाळिंब पिकासाठी योग्य जमिनीची निवड, मृदा आरोग्य आणि संतुलित खत व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. प्रकल्पाचे रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे यांनी डाळिंबावरील तेलकट डाग व मर रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय हजारे यांनी डाळिंबावरील प्रमुख किडींचे नियंत्रण व व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. यावेळी झालेल्या प्रक्षेत्र भेटीदरम्यान तांभेरे शिवारातील श्री. गोरख गागरे तसेच कानडगाव व चिंचविहिरे शिवारातील श्री. सुनील घोरपडे, श्री. अनिल घोरपडे, श्री. सोमनाथ गागरे, श्री. सतीश गागरे, श्री. वासुदेव लोंढे, श्री. रावसाहेब लोंढे, श्री. बाबासाहेब लोंढे आणि पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषि सहाय्यक श्री. दत्तात्रय गायकवाड व डाटा ऑपरेटर श्री. विलास खिलारी यांनी विशेष परिश्रम घेतले.



