Breaking
ब्रेकिंग

विद्यार्थी हित धोक्यात; चुकीच्या धोरणांमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणावर संकट, शिक्षक भारतीची आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत निर्णायक बैठक

0 8 6 5 2 1

*विद्यार्थी हित धोक्यात; चुकीच्या धोरणांमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणावर संकट, शिक्षक भारतीची आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत निर्णायक बैठक*

*शिक्षक भारतीची आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत निर्णायक सहविचार सभा; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत तातडीच्या बैठकीचे आश्वासन*

राहुरी तालुका जावेद शेख

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेसमोर अभूतपूर्व संकट उभे राहिले असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास एकतृतीयांश कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक भारती संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार तांबे यांनी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा. दादा भुसे यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
बैठकीत संच मान्यता, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न, टप्पा अनुदान, जुनी पेन्शन योजना, ‘नो वर्क – नो पे’चा धोका, शालार्थ प्रकरणे, शिक्षकांचे सेवा संरक्षण यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली.
शिक्षक भारतीने स्पष्टपणे मांडले की, सध्याची संच मान्यता प्रक्रिया आणि धोरणे कायम राहिली तर राज्यातील हजारो कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त ठरतील. याचा परिणाम केवळ शिक्षकांपुरता मर्यादित राहणार नसून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावरही होणार आहे. अतिरिक्त झालेल्या शिक्षकांवर मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक ताण वाढेल, तर विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांचा लाभ कमी होईल.
संघटनेने विज्ञान शाखेतील प्रॅक्टिकल बॅचची विद्यार्थीसंख्या २० वरून ३० करण्याच्या निर्णयालाही तीव्र विरोध नोंदविला. विज्ञान विषयातील प्रयोग प्रत्यक्ष सहभागातून शिकवले जातात. त्यामुळे एका बॅचमध्ये ३० विद्यार्थी असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला प्रयोग करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. परिणामी प्रयोगाधारित शिक्षणाची गुणवत्ता घसरेल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.
याचबरोबर शिक्षक भारतीने २००७ च्या शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या तासिका ४५ मिनिटांवरून ४० मिनिटे करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. जर माध्यमिक संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांना ४० मिनिटांची तासिका व विद्यार्थी तुकडी ८० विद्यार्थी लागू असेल, तर वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांनाही ४० मिनिटे तासिकेसोबत ८० विद्यार्थी तुकडी ठेऊन समान नियम लागू करावेत, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली.
शिक्षक भारतीने इशारा दिला की, राज्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना आपल्या सेवेला किती मोठा धोका निर्माण झाला आहे, याची अद्याप पूर्ण जाणीव झालेली नाही. ही केवळ शिक्षकांची लढाई नसून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रश्न आहे. आज योग्य निर्णय न झाल्यास उद्या शिक्षक अतिरिक्त होतील, प्रयोगशाळेतील शिक्षणावर परिणाम होईल, वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढेल आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होतील.
बैठकीस शिक्षक भारती पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर, अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, जिल्हा संघटक चंद्रशेखर हासे, प्रवीण मालुंजकर, विजय पांडे, जवाहर पांडे, अकोले तालुकाध्यक्ष संपत वाळके, संदीप काळे, मुख्याध्यापक बाबासाहेब दातीर, शिंदे सर, कुसमुडे सर, राठोड सर, शिशुपाल वाघमारे सर, ज्येष्ठ मार्गदर्शक पाळंदे सर तसेच शिक्षक भारतीचे अनेक पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
शिक्षक भारतीची प्रमुख मागणी
“विद्यार्थी हित प्रथम” या भूमिकेतून संच मान्यता, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न, टप्पा अनुदान, जुनी पेन्शन, सेवा संरक्षण, विज्ञान शाखेतील २० विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल बॅच कायम ठेवणे, ४५ मिनिटांची तासिका पूर्ववत करणे आणि सर्व प्रकारच्या कनिष्ठ महाविद्यालयांना समान नियम लागू करावेत. अन्यथा राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची जबाबदारी शासनाची राहील, असा स्पष्ट इशारा शिक्षक भारतीने दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे