वृत्तपत्रातील पत्रलेखन हे लोकशाहीचे प्रभावी व्यासपीठ: डॉ. श्रीकांत येळेगावकर
जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाच्या वतीने दोन पुस्तकांचे प्रकाशन

वृत्तपत्रातील पत्रलेखन हे लोकशाहीचे प्रभावी व्यासपीठ: डॉ. श्रीकांत येळेगावकर
जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाच्या वतीने दोन पुस्तकांचे प्रकाशन
प्रतिनिधी : संवेद वायकर
सोलापूर दि.८ – “वृत्तपत्रातील संपादकीय लेख विचारांचा पाया घालतात, तर वाचकांचा पत्रव्यवहार हा समाजाशी थेट संवाद साधतो. पत्रलेखकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज जागृती करावी, कारण वृत्तपत्रातील विविध सदरे समाजातील प्रत्येक घटकासाठी अर्थपूर्ण योगदान देत असतात,” असे प्रतिपादन डॉ.श्रीकांत येळेगावकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी होते.
सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचच्या वतीने आयोजित फैय्याज शेख लिखित ‘जनमत’ आणि अरुण धुमाळ लिखित ‘पत्र प्रबोधन’ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा लोकमान्य टिळक सभागृह येथे संपन्न झाला. या प्रसंगी डॉ. येळेगावकर बोलत होते. या वेळी डॉ. सूर्यप्रकाश कोठे, महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख पद्माकर कुलकर्णी, वृत्तपत्र लेखक मंचचे कार्यवाह सुनील पुजारी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
जोशी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “पत्रलेखन हे केवळ लिहिणे नसून ते एक समाजकार्य आहे. वृत्तपत्राच्या संपादकीय पृष्ठावर स्थान मिळवणे हा सामान्य माणसाचा मान आहे. लोकशाहीत सर्वसामान्यांचे विचार जाणून घेण्यासाठी ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ हे सदर अत्यंत महत्त्वाचे आहे”.
पद्माकर कुलकर्णी यांनी समाजातील त्रुटींवर बोट ठेवून व्यवस्थेला जाब विचारण्याचे धारिष्ट्य पत्रलेखक दाखवत असतात. त्यांचे शब्द म्हणजे जनसामान्यांच्या हक्काचा आवाज असून ते खऱ्या अर्थाने लोकशाहीचे पहारेकरी आहेत. असे सांगितले. तर डॉ.सूर्यप्रकाश कोठे यांनी आजच्या काळात सजग पत्रलेखकांची मोठी गरज असून, दोन्ही लेखकांनी पुस्तकांच्या माध्यमातून दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी लेखक फैय्याज शेख व अरुण धुमाळ यांनी आपल्या मनोगतातून पुस्तकाच्या निर्मिती मागची भूमिका आणि पत्रलेखनाचा आपला प्रवास उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह सुनील पुजारी यांनी केले, सूत्रसंचालन प्रेमचंद मेने यांनी तर आभार प्रदर्शन अशोक म्हमाणे यांनी केले.
या कार्यक्रमाला दत्ताआण्णा सुरवसे, वसंत सावंत, प्रा. नरेंद्र काटीकर, कवी मारुती कटकधोड, राजेंद्र भोसले, प्रा. शिवाजीराव देशमुख, ॲड. रफिक बागबान, सुभाषचंद्र खुणावत, डॉ.धर्मसाले यांसह अनेक लेखक, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



