‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ मानुन काम करणारे गणेश चिवटे यांचे कार्य प्रेरणादायी आहे:- मा. आ. जयवंतराव जगताप

‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ मानुन काम करणारे गणेश चिवटे यांचे कार्य प्रेरणादायी आहे:- मा. आ. जयवंतराव जगताप
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १९/ “निराधारांचे मातृत्व स्वीकारत ‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ या भावनेतून कार्य करणारे गणेशभाऊ चिवटे यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे,” असे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले. करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त सन 2018 साली सुरू करण्यात आलेल्या निराधारांसाठीच्या अन्नदान उपक्रमाचा नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमासाठी ह.भ.प. नाना महाराज पांडेकर व संत साहित्याचे अभ्यासक ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, माजी नगराध्यक्ष अमोदशेठ संचेती, उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक प्रशांत ढाळे, रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, वीट पंचायत समितीचे सदस्य दिलीप ढेरे, हिसरे पंचायत समिती सदस्य भरतभाऊ आवताडे, मानसिंग खंडागळे, श्रेणिक खाटेर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जगताप म्हणाले, की श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे हे गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने निराधारांना अन्नदान करत आहेत. केवळ अन्नदानच नव्हे, तर त्यांनी निराधारांचे मातृत्व स्वीकारत त्यांना आपलेपणाची ऊब दिली आहे. ही सेवा केवळ उपक्रम नाही, ती एक साधना आहे. ज्यांच्या मनात खऱ्या अर्थाने करुणा आणि प्रामाणिकपणा असतो, त्यांच्याच हातून असे कार्य घडते, असे ते म्हणाले. गणेशभाऊ हे सामाजिक कार्य करताना स्वतःच्या खिशातून खर्च करतात याचा विशेष उल्लेख करत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले की समाजातील वंचित घटकांना आधार देण्याची त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे. निराधारांना कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणार असून, लवकरच या दृष्टीने ठोस पावले उचलली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना मोफत भात-भाजी वाटप, गोरगरिबांसाठी सामुदायिक विवाह सोहळा तसेच विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी समाजसेवेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच त्यांना जनमाणसातून मोठे पाठबळ मिळत असून अलीकडील निवडणुकीत मतदारांनी दिलेला भरघोस प्रतिसाद हे त्याचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी ॲड. डॉ. बाबुराव हिरडे यांनी संत साहित्याचा संदर्भ देत सेवा, दया आणि परोपकार हीच खरी ईश्वरभक्ती असल्याचे प्रतिपादन केले. निराधार, गरजू आणि वंचित घटकांना आधार देणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
ह.भ.प. नाना महाराज पांडेकर यांनी शिवजयंतीचा संदेश कृतीतून साकार करण्याचे आवाहन केले. श्रीराम प्रतिष्ठानचा अन्नदान उपक्रम हा समाजातील सकारात्मक परिवर्तनाचा मार्ग असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी गणेश चिवटे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधनु आम्ही त्यांचे विचार आत्मसात करून हा छोटेखानी चालू केलेला उपक्रम आज सर्वांच्या सहकार्याने मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित झाला आहे, आजपर्यंत आम्ही अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून एक लाख चाळीस हजार डब्यांचे वाटप केले आहे, भविष्यात अन्नदानाबरोबरच निराधारांसाठी निवाऱ्याची उभारणी करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम प्रतिष्ठानचे संचालक भीष्माचार्य चांदणे यांनी केले. त्यांनी नऊ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत उपक्रमाच्या विस्ताराची माहिती दिली. सूत्रसंचालन ॲड .भगवान गिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जय श्रीराम विलास जाधव यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



