माहिती तंत्रज्ञान, एआय युगातही आकाशवाणीला श्रोत्यांची पसंती : डॉ. उद्धव शिंदे

माहिती तंत्रज्ञान, एआय युगातही आकाशवाणीला श्रोत्यांची पसंती : डॉ. उद्धव शिंदे
एस डब्ल्यू न्यूज नेटवक
अहिल्यानगर – माहिती तंत्रज्ञान आणि एआयच्या युगात आजही आकाशवाणीला श्रोत्यांची पसंती मिळत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर आकाशवाणीही बदल स्वीकारत आहे. मनोरंजनाचे अनेक माध्यमे उपलब्ध असतानाही आकाशवाणी दर्जेदार कार्यक्रम, विश्वासार्ह माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवत आहे आणि सदैव पोहोचवत राहील, हा विश्वास आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले. अहिल्यानगर आकाशवाणी केंद्राला सोमवारी ३४ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त ‘स्नेहबंध’तर्फे डॉ. उद्धव शिंदे यांनी आकाशवाणीचे सहाय्यक अभियंता मोईन शेख, प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे, जयंत लाटे, गजेंद्र पवार, महेंद्र रोहकले, रावसाहेब देशमाने, देविदास अवलेलू यांचा शाल, रोप व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. याप्रसंगी इंजिनियर अभिजीत ढाकणे, शिल्पकार बालाजी वल्लाल, तुषार मेघळे, वृषाली हिवाळे, आयुष लालबोंद्रे, स्वराज हिवाळे उपस्थित होते.
डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, बदलता काळ, बदलती परिस्थिती, यानुसार आकाशवाणीही बदलत आहोत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन दररोज सकाळी ५.५३ वाजेपासून ते रात्री ११.१० मिनिटापर्यंत आकाशवाणी श्रोत्यांना ज्ञान, माहिती सोबत मनोरंजन आणि प्रबोधनही करत आहे. आजही असंख्य श्रोत्यांच्या दिवसाची सुरुवात आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मंगलध्वनी आणि मंगलप्रभातने होते. वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांमुळे आकाशवाणी आणि श्रोते यांच्यात एक वेगळे नाते निर्माण झाले आहे.