राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धा तिफनचे कृषि विद्यापीठात उत्साहात प्रारंभ
तिफन ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कृषी यंत्र निर्मितीमध्ये कल्पकतेला चालना देणारी - - कुलगुरू डॉ. शरद गडाख

राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धा तिफनचे कृषि विद्यापीठात उत्साहात प्रारंभ
तिफन ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कृषी यंत्र निर्मितीमध्ये कल्पकतेला चालना देणारी – – कुलगुरू डॉ. शरद गडाख
राहुरी तालुका जावेद शेख
आपल्या देशात ३५% ते ४५% टक्के यांत्रिकीकरण आहे. जपानमध्ये 95% तर चायना मध्ये 75 % यांत्रिकीकरण आहे. इतर देशांशी तुलना केल्यास आपल्या देशात यांत्रिकीकरणाला मोठा वाव आहे. प्रगत राष्ट्रांमध्ये शेतकरी कमी आणि जमीन धारणा जास्त असल्याने तेथे शेतीसाठी मोठे यंत्रे विकसित झाले आहे. आपल्या देशात छोटे व अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या गरजेनुसार छोटे यंत्र व अवजारे विकसित करणे आवश्यक आहे. याचबरोबर बहुउद्देशीय यंत्रे, बॅटरीवर व सौर उर्जेवर चालणारी यंत्रे विकसित करणे आवश्यक आहे. तिफन ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कृषी यंत्र निर्मितीमध्ये कल्पकतेला चालना देणारी असल्याचे प्रतिपादन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफन-2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पासून तीन दिवस चालणाऱ्या ट्रॅक्टरचलीत भाजीपाला पूर्नलागवड यंत्रे या विषयावरील या स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स, इंडियाचे अध्यक्ष डॉ. नागराजन गोविंदन उपस्थित होते. यावेळी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड, कंपनीचे प्रॉडक्ट डिझाईनचे प्रमुख श्री. विवेक जोशी, कस्टमर सपोर्ट आणि मार्केटिंग विभागाचे प्रमुख श्री. राजेश लिंगमपल्ली, कमिंस इंडिया लिमिटेडचे संचालक डॉ. अमोल रेलकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नितीन दानवले, जॉन डियरच्या अभियांत्रिकीच्या ग्रुप मॅनेजर श्रीमती राखी चांडक, जॉन डीअरचे अवजारे विभाग प्रमुख श्री. संदीप अवसारे, कार्यक्रमाचे संयोजक श्री. संदीप राजपूत, अल्टर कंपनीचे प्रमुख बी. एस. रमेशा उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलताना पुढे म्हणाले की आपल्या देशात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला वीस वर्षांपूर्वी सुरुवात झाली. आता यात प्रचंड बदल झाले असून यांत्रिकीकरणाला कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि रोबोटिक्सची साथ मिळाली आहे. भविष्यातील शेती ही ए आय आणि आधुनिक यंत्रावर आधारित असणार आहे.
यावेळी डॉ. नागराजन गोविंदन मार्गदर्शन करतांना म्हणाले की आजकाल पदवी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा कल आयटी आणि रोबोटिक्स कडे जास्त आहे. परंतु मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक इंजीनियरिंग हा खरा मूलभूत अभियांत्रिकीचा पाया आहे. या शाखेंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी देशातील प्रत्येक इंडस्ट्रीने मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक कॉलेज दत्तक घेणे गरजेचे आहे. सोसायटी ऑफ ऑटोमॅटिक इंजिनियर्स ऑफ इंडिया या संस्थेने सुरू केलेली राष्ट्रीय पातळीवरील तिफन ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या बुद्धी कौशल्यात वाढ करणारी असल्याचे यावेळी ते म्हणाले.
याप्रसंगी डॉ. रवींद्र बनसोड, श्री. विवेक जोशी, श्री. राजेश लिंगमपल्ली, डॉ. अमोल रेलकर, श्रीमती राखी चांडक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिफनचे संयोजक श्री. संदीप राजपूत यांनी केले. या स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून या स्पर्धेचा विषय ट्रॅक्टरचलीत किंवा स्वयंचलीत भाजीपाला पूर्नलागवड यंत्रे हा आहे. सदर स्पर्धेसाठी देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील 66 संघ सहभागी झाले होते. त्यातील अंतीम फेरीसाठी नऊ राज्यातून 36 संघाची अंतीम फेरीमध्ये निवड झालेली आहे. यामध्ये पंजाब राज्यातील चार संघ, तामिळनाडू राज्यातील पाच संघ, मध्यप्रदेश तीन संघ, केरळा, तेलंगणा व दिल्ली प्रत्येकी एक संघ व महाराष्ट्रातून 21 संघ असे एकुण 36 संघ सहभागी झालेले आहे. तीन दिवस चालणार्या या स्पर्धेत अंतिम 36 संघानी बनविलेल्या ट्रॅक्टरचलीत भाजीपाला पूर्नलागवड यंत्रांच्या पाच वेगवेगळ्या सेक्शनमध्ये चाचण्या होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष शेतावरती देखील या यंत्रांची परिक्षा घेतली जाणार असल्याचे कृषी यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे व संयोजक श्री. संदीप राजपूत यांनी सांगितले. या अंतिम फेरीत 36 संघातील स्पर्धेसाठी एकुण 750 विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि 50 पेक्षा जास्त मार्गदर्शक सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कृषि यंत्रांची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील 30 पंचांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विविध विभागांचे विभाग प्रमुख डॉ. वीरेंद्र बारई, डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. विक्रम कड आणि प्राध्यापक व कर्मचारी तसेच संयोजक कमिटीचे पदाधिकारी रोहन जगदाळे, शितल कोलते, पराग चौधरी, सुशांत कदम, शिवानी खंडार, संदीप, ऋषिकेश शिंदे, कुलदीप सिंगल, अजय अग्रवाल इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जॉन डीअर कंपनीच्या कृपाली पूर्वीया व गायत्री पाटील यांनी केले तर आभार रोहन जगदाळे यांनी मानले.