जनतेच्या सुरक्षेसाठी बंद सीसीटीव्ही पुन्हा सुरू करावेत
जनतेच्या सुरक्षेसाठी बंद सीसीटीव्ही पुन्हा सुरू करावेत
विशेष प्रतिनिधी : पंकज पाटील
अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून शहरातील बहुतेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने चोरट्याना चांगलेच फावले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने संयुक्तरित्या प्रयत्न करून सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत अशी मागणी होत आहे.
तत्कालीन डीवायएसपी राकेश जाधव , पो नि जयपाल हिरे यांच्या प्रयत्नाने तसेच दात्यांच्या देणगीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात आले होते. मात्र या सीसीटीव्हीचे नियंत्रण काही खाजगी लोकांकडे असल्याने कालांतराने ते बंद पडले आहेत. रस्त्याच्या कामांमुळे खोदकाम झाले आहे , लाईट बदलण्यात आले त्यामुळे काही ठिकाणी केबल तुटल्या आहेत अशा अनेक बाबींमुळे सीसीटीव्ही कॅमेरे असूनही बंद स्थितीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरी , मध्यंतरी सोनसाखळी ओढणे , दमबाजी करून लुटणे असे प्रकार झाल्यानन्तर चोरटे शहराच्या बाहेर पळण्याचा प्रयत्न करतात किंवा शहरातून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. सीसीटीव्ही बंदमुळे पोलिसांना अडचणी निर्माण होतात.
वाहतुकीची कोंडी , अवैध वाहतूक , हाणामाऱ्या किरकोळ प्रकार यात चूक कोणाची ही बाब निदर्शनास येत नाही. कुंटे रोड , बालेमिया , बोरी नदीचा पूल , मंगलमूर्ती चौक , बसस्थानक रोड , पाचपावली देवी मंदिर , महाराणा प्रताप चौक , अण्णाभाऊ साठे चौक अशा अनेक ठिकाणी रस्त्यांवर अतिक्रमण आणि वाहतुकीची कोंडी झाल्याने किरकोळ वाद होतात. मात्र चूक कोणाची कळत नाही. काही अवैध प्रवासी वाहने मुद्दामहून रस्त्यात उभी राहतात. हात गाडी चालक मोटरसायकलस्वार किंवा पायी चालणार्यांना जागा देत नाहीत. भविष्यात पंचायत समिती , प्रशासकीय इमारत , महसूल इमारत या धुळे रस्त्यालगत उभारल्या जात असल्याने याठिकाणची वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अतिक्रमण नियंत्रित करणे आजपासूनच गरजेचे आहे अन्यथा भयंकर परिणाम होतील.
त्यामुळे लोकप्रतिनिधी , पोलीस प्रशासन , नगरपालिका प्रशासन , महसूल प्रशासन यांनी संयुक्तरित्या पुढाकार घेऊन शहरातील बंद पडले सिसीटीव्ही पुन्हा सुरू करून कॅमेऱ्यांचे जाळे वाढवावे आणि त्याचे नियंत्रण पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्याकडे ठेवावे अशी मागणी होत आहे.