संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न*
हजारो भाविकांनी पालखी आणि हभप प्रसाद महाराजांचे दर्शन घेतले*

*संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न*
*हजारो भाविकांनी पालखी आणि हभप प्रसाद महाराजांचे दर्शन घेतले*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर : वैशाख शुद्ध पौर्णिमेला १२ रोजी संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. संत सखाराम महाराजांचा जयघोष करत हजारो भाविकांनी पालखी आणि हभप प्रसाद महाराजांचे दर्शन घेतले.सकाळी सहा वाजेच्या सुमारास विठ्ठल रुख्मिणी मंदिरातून लालजींची पूजा करून मूर्ती पालखी मध्ये ठेवण्यात आली. वाजत गाजत वाडी चौक , राजहोळी चौक , पानखिडकी ,सराफ बाजार , मार्गे मिरवणूक सायंकाळी पावणे सहा वाजेला दगडी दरवाजा मध्ये आली. पावसामुळे एक तास विश्रांती दरवर्षी कडक उन्हात प्रसाद महाराज अनवाणी फिरतात. यंदा ढगाळ वातावरणाने ऊन सावली मुळे थोडा दिलासा मिळाला. मात्र दुपारून पाऊस पडल्याने एक तास मिरवणूक थांबवण्यात आली होती. पाऊस थांबल्यावर पुन्हा मिरवणूक सुरू झाली. पालखी दगडी दरवाज्यात आल्यावर वाहतूक महाराणा प्रताप चौकातून सुभाष चौक मार्गे वळवण्यात आली. एकमेव रस्ता मोकळा असल्याने वाहतूक कोंडी होत होती. बस स्थानकसमोर पालिकेने लोखंडी बॅरिकेट्स लावून ठेवल्याने नागरिकांच्या आणि वाहनांचा रस्ता बंद करून ठेवला त्याचा लाभ अतिक्रमण धारक आणि व्यापारी घेत आहेत. त्यामुळे त्या मार्गाने वाहतूक वळती करता येत नाही.पालखी मिरवणुकीच्या सर्वात आधी मिळचाळ मधील छत्रपती शिवाजी व्यायामशाळा मंडळ आणि त्या मागे बंगालीफाईल येथील बालवीर व्यायामशाळेच्या मंडळाचे कार्यकर्ते ढोल ताशा च्या गजरात लेझीम नृत्य करत होते. त्यामागे शिवशक्ती डी जे , नगारखाना , पाठोपाठ पारंपरिक घोडेस्वार , त्यामागे वाहनावर संत सखाराम महाराजांचा भव्य पुतळा ठेवण्यात आला होता. पाठीमागे मारुती व गरुड वहन ठेवण्यात आले होते. काशी विश्वनाथ भजनी मंडळ च्या मागे पालखी मिरवणूक होती. पुढे भुसावळ येथील रेल्वे बँड पथक होते. नंतर चाळीसगाव बँड पथक सामील झाले होते. पालखीच्या मागे चांदीच्या मोठ्या रथात संत सखाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका आणि मुखवटा ठेवण्यात आला होता. सर्वात शेवटी आपल्या सेवेकऱ्यांसोबत हभप प्रसाद महाराज अनवाणी चालत होते. असंख्य भाविकांनी पालखी आणि प्रसाद महाराजांचे दर्शनासाठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी ठिकठिकाणी पालखी ,महाराज यांच्याजवळ महिला होमगार्ड आणि पोलिसांची नियुक्ती केली होती. तसेच साध्या वेशातील पोलीस देखील फिरत होते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेची व शिस्तीत दर्शनाची काळजी घेतली जात होती.रस्त्यात ठिकठिकाणी भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून स्वामी मित्र मंडळ , लायन्स क्लब , ओम साई लहरी भजनी मंडळ , कुसुमाई बिझिनेसग्रुप , पू सानेगुरुजी स्कील डेव्हलपमेंट सेंटर ,स्व प्राची भट यांच्या स्मरणार्थ डॉ अभिषेक भट , रोटरी क्लब , राजे संभाजी मित्र मंडळ यांच्या तर्फे ताक , मठ्ठा , थंडपेय ,सरबत ,फराळ ,अल्पोपहार वाटप करण्यात आले. विविध समाजसेवी संस्थांतर्फे पाण्याचे जार ठेवण्यात आले होते.