गुंडेगावच्या ८५१ हेक्टर वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा थैमान
_रानडुक्करांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले — बिबट्याच्या भीतीने गावात दहशत — वन अधिकारी कोठे लपले?_
गुंडेगावच्या ८५१ हेक्टर वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा थैमान
_रानडुक्करांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले — बिबट्याच्या भीतीने गावात दहशत — वन अधिकारी कोठे लपले?_
गुंडेगाव (तालुका नगर) प्रतिनिधी :- अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरात ८५१ हेक्टरवर पसरलेले घनदाट वनक्षेत्र आता गावकऱ्यांसाठी संकट बनले आहे. वन्यप्राण्यांचा धुमाकुळ दिवसेंदिवस वाढत असून, रानडुक्कर, हरीण आणि बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.रानडुकरांच्या टोळ्या रात्रीच्या सुमारास शेतात घुसून उस, मका, हरभरा, आणि भाजीपाला पूर्णपणे उद्ध्वस्त करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पिके नष्ट होताना पाहिली आहेत.
गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही वन अधिकारी घटनास्थळी फिरकलेले नाहीत.
“शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, पण वन विभाग झोपला आहे. आम्ही रोज जीव मुठीत घेऊन शेतात जातो. बिबट्याच्या भीतीने रात्री कुणालाही बाहेर पडायची हिम्मत होत नाही,”असे शेतकरी महादेव चौधरी यांनी संतापाने सांगितले.
गुंडेगाव परीसरातील चौधरवाडी,धावडे वाडी, कुताळमळा, वाघदरा, भापकरवस्ती, कोळगाव खिंड या परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काही ठिकाणी कुत्रे, शेळ्या फाडून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तरीही वन विभागाचा अधिकारी, कर्मचारी आणि पथक कुठेच दिसत नाही.गावकऱ्यांनी थेट प्रश्न विचारला आहे . “गुंडेगावचे वन अधिकारी नेमके आहेत तरी कोठे? ड्युटीवर आहेत का, की फक्त नावापुरते?”
स्थानिक नागरिकांचा संताप उफाळला आहे.वन विभागाने तातडीने पुढील उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे वनक्षेत्रात पथक नेमावे. सापळे व प्रकाश व्यवस्था करावी.शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.जर पुढील काही दिवसांत उपाय झाले नाहीत, तर शेतकरी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
*गुंडेगाव सारख्या मोठ्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव हा केवळ निसर्गाचा नव्हे, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे.शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाणार नाही वन विभागाने जबाबदारी घेतलीच पाहिजे, अन्यथा लोकांचा रोष उफाळणार हे निश्चित.*
संजय भापकर , ग्रांमस्थ गुंडेगाव



