पोषणमुल्य सुरक्षेसाठी आहारात तृणधान्यांचा समावेश अत्यावश्यक*- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे*

*पोषणमुल्य सुरक्षेसाठी आहारात तृणधान्यांचा समावेश अत्यावश्यक*- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे*
*राहुरी विद्यापीठ, दि. 18 डिसेंबर, 2025*
तृणधान्यांचे पोषणमुल्य लक्षात घेता सर्व सामन्यांच्या दृष्टीने तृणधान्य आहारात असणे गरजेचे आहे. आपली रोगप्रतिकारकशक्ति उत्तम ठेवण्यासाठी तृणधान्याचा वापर आहारात वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी नाचणी, राळा, इ. तृणधान्याचा वापर व्हावा. तृणधान्यामध्ये पोषणमुल्य अधिक असल्याने या पिकांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तृणधान्याचा प्रचार व प्रसार करावा त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान शेतकरीवर्गास विद्यापीठामार्फत देण्यात येईल. विद्यापीठाचे तंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकर्यांनी प्रगती साधावी. पोषणमुल्य सुरक्षेसाठी आहारात तृणधान्यांचा समावेश अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, कृषि विभाग महाराष्ट्र शासन आणि दीपस्तंभ अॅग्रो फार्मर प्रोडुसर कंपनी, मानोरी यांच्या संयुक्त विद्यमाने नाचणी लागवड तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मौजे मानोरी, ता. राहुरी येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. याप्रसंगी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आनंद चवई, दीपस्तंभ अॅग्रो फार्मर कंपनीचे संचालक डॉ. दत्तात्रय वने, तालुका कृषि अधिकारी बापुसाहेब शिंदे, डॉ. सुनील अडांगळे, डॉ. योगेश बन व मंडळ कृषि अधिकारी अशोक गिरगुणे उपस्थित होते.
यावेळी डॉ. आनंद चवई मार्गदर्शन करतांना म्हणाले की राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत नाचणी व पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, लागवडीचे महत्व आणि अपारंपारिक भागात लागवड क्षेत्र, उत्पादन व उपलब्धता वाढविण्यासाठी शेतकर्यांच्या शेतावर प्रायोगिक प्रात्यक्षिक घेण्यात येत आहेत. त्यामुळे तृणधान्य पिकांचे पोषणमुल्य व महत्व लक्षात घेता शेतकर्यांनी या पिकांची लागवड करावी व आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. सुनील अडांगळे म्हणाले की राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत भरडधान्यांचे प्रात्यक्षिक राबविण्यात येणार असून त्याचे मुल्यवर्धन करण्यासाठी शेतकरीवर्गास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्यांच्या प्रक्षेत्रावर तृणधान्य पिकांचे प्रयोग राबविण्यात येणार आहेत. यावेळी डॉ. योगेश बन यांनी नाचणी व पौष्टिक तृणधान्य पिके, ओळख, आहारातील व लागवडीचे महत्व, शाश्वत शेती पर्याय, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील राज्यपुरस्कारप्राप्त शेतकरी कलगोंडा टेळे यांनी यशस्वी उन्हाळी नाचणी लागवड यशोगाथा या विषयावर अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. सुनील अडांगळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी बचटगटांच्या महिला प्रतिनिधी याच्यासह 50 पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.



