आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच लढवणार:- दिग्विजय बागल

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच लढवणार:- दिग्विजय बागल
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १३/ आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच लढवण्यात येणार असून, विकासकामांच्या जोरावर करमाळा तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार आहे, असे प्रतिपादन भाजप नेते दिग्विजय बागल यांनी केले. करमाळा येथील बागल निवासस्थानी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित विचारविनिमय मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील होते.
यावेळी बोलताना बागल म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी कार्यकर्त्यांनी स्वबळावर ठेवावी. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व ताकदीने पार पाडणे आवश्यक आहे. युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय योग्य वेळी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. मात्र तोपर्यंत संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास व्यासपीठावर मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, उपनगराध्यक्ष अतुल फंड, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, मकाईचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, साहेबराव रोकडे, भाजप तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, भाजप ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन पिसाळ, आदिनाथ चे माजी संचालक दत्तात्रय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विजय रोकडे, शुभम बंडगर, लक्ष्मण केकान, भाऊसाहेब गव्हाणे, गणेश भोरे, यशपाल कांबळे, कल्याण सरडे, रमेश कांबळे, देवकर गुरूजी यांनी आपली मते मांडत पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेनुसारच करमाळा तालुक्यातील राजकीय वाटचाल सुरू राहील. सर्वसामान्यांचे हित व पक्षवाढीसाठी प्रसंगी माघार घेण्याची तयारी आहे; मात्र चुकीच्या गोष्टींवर कठोर भूमिका घेतली जाईल. तसेच विलासराव घुमरे यांनी करमाळा तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगून, गटतट व मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने विकासकामांच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पवार सूत्रसंचालन नितीन चोपडे व रणजित शिंदे यांनी केले, तर आभार विजय लावंड यांनी मानले.



