…अखेर विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या मागणीला यश
कृषी विद्यापीठ प्रशासनाला प्रकल्पग्रस्तांच्या भरतीबाबत 'विद्रोही'ने दिले होते निवेदन
…अखेर विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या मागणीला यश
कृषी विद्यापीठ प्रशासनाला प्रकल्पग्रस्तांच्या भरतीबाबत ‘विद्रोही’ने दिले होते निवेदन
एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा : जावेद शेख
राज्यातील विद्यापीठातील रिक्त ५० टक्के जागेवर प्रकल्पबाधित झालेल्यांना नोकरी देण्याचा निर्णय झाल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ३० जानेवारीपर्यंत प्रकल्पग्रस्त दाखल्यांसह अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. परंतु, दाखले मिळत नसल्याने विद्यापीठ प्रशासनाने अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी विद्रोही विद्यार्थी संघटनेने केली होती, अखेर त्या मागणीला यश आले असून कृषी विद्यापीठ प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध करून प्रकल्पग्रस्तांच्या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाढविली आहे.
शासनाकडून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नसल्याने अनेकदा आंदोलने, निवेदने देण्यात आली होती. प्रकल्पग्रस्तांनी वेळोवेळी जमिन दिल्याच्या मोबदल्यात नोकरी मिळावी म्हणून लढा देत असताना पहिल्या पिढीला अपयश आलेले होते. दुसऱ्या पिढीने मात्र राज्य शासनाचे लक्ष वेधत अखेरीस प्रकल्पग्रस्त भरतीला हिरवा कंदिल दर्शविला होता.
राज्यातील सर्वच विद्यापीठांमधील गट क व ड पदाच्या रिक्त पदांच्या जागेवर ५० टक्के प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी, असा शासन अध्यादेश येताच विद्यापीठाने प्रकल्पग्रस्त भरतीला चालना दिली.
दि. ३० जानेवारी २०२५ पर्यंत प्रकल्पग्रस्त धारकांना अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या पुनर्वसन विभागातून प्रकल्पग्रस्त दाखले देण्यास बंद झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातून दाखले मिळत नसल्याने त्याबाबत विद्रोही विद्यार्थी संघटनेने राज्य शासनाकडे लढा सुरू केले असल्याची माहिती संघटनेचे डॉ. जालिंदर घिगे, कुमार भिंगारे, सुदर्शन बोर्ड, अमोल बोर्ड, पवन पवार, निलेश बोर्डे, कुणाल कर्डक, प्रफुल्ल बोर्डे, रविंद्र कर्डक, सुरज पवार आदींनी दिली होती.
शासनाकडून प्रकल्पग्रस्तांना दिलासा देणारा निर्णय घेण्यास भाग पाडू व लवकरच प्रकल्पग्रस्तांना दाखले मिळवून देवू. विद्यापीठाने प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, यासाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव यांना निवेदन देण्यात आले होते. अखेर दिलेल्या निवेदनातील मागणीची दखल घेऊन कृषी विद्यापीठ प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध करून प्रकल्पग्रस्तांच्या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाढविली आहे.
या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना दिलासा मिळाला असून संबंधित मागणीबाबत विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रकल्पग्रस्त उमेदवारांकडून अभिनंदन होत आहे.