आमसभेत तरी या प्रश्नांची उत्तरे मिळणार का ?*
*आमसभेत तरी या प्रश्नांची उत्तरे मिळणार का ?*
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २२/ 30 मे 2025 रोजी नालबंद मंगल कार्यालय करमाळा येथे होणाऱ्या आमसभेसाठी प्रशासनाबद्दल लोकांच्या मनात असलेले अनेक प्रश्न माजी आमदार संजयमामा शिंदे गटाकडून विचारले गेलेले आहेत. त्याची उत्तरे किमान आमसभेत तरी मिळणार का याची उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत अवताडे यांनी पाटबंधारे व पोलीस विभागाला अनुसरून प्रश्न उपस्थित केला आहे की दहिगाव बंद पाईप योजनेचे काम गेल्या चार-पाच महिन्यापासून बंद पाडण्यात आले आहे. दोन ठिकाणी पाईप जाळण्यात आले यासंदर्भात गुंन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक का होत नाही ? आणि काम सुरू करण्याची कार्यवाही का होत नाही? दुसरा प्रश्न उपस्थित केला आहे की, दहिगाव योजनेचे काम बंद पाडण्यात आल्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांची करोडो रुपयांची पिके पाणी अभावी जळाली या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून याची भरपाई पाटबंधारे विभागाने शासनाकडून मिळवून द्यावी.
घोटीचे सरपंच विलास माणिकराव राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी प्रश्न उपस्थित केला आहे की, सन 2019 ते 2024 या काळात डिकसळ पूल, HAM रस्ता यासह मतदारसंघातील अन्य पूल व रस्ते बांधणीसाठी एक हजार कोटीहून अधिक निधी मिळाला होता व ही कामे सुरू झाली होती. यातील काही कामे सध्या बंद तर काही कामे संथ गतीने सुरू आहेत ही कामे पूर्ण कधी होणार ?असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते विवेक येवले यांनी महसूल विभागाला प्रश्न विचारला आहे की, उजनी जलाशय व सीना नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा बेकादेशीरपणे व राजरोसपणे होत आहे या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई सातत्याने का केली जात नाही ? तर नगरपरिषद करमाळासाठी त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, करमाळा शहरातील रस्ते, उघड्या गटारी, सार्वजनिक आरोग्य यांची सततची दुरावस्था, मोकाट जनावरे, वाढती अतिक्रमणे, बेशिस्त वाहतूक याविषयी कुठलीही ठोस कार्यवाही का केली जात नाही ?
डॉ. विकास वीर यांनी पाटबंधारे विभागाला प्रश्न विचारलेले आहेत की उजनी ते कोळगाव भूमिगत बोगद्याचे काम पूर्ण होत आलेले आहे. या बोगद्यावर अनेक शेतकऱ्यांनी कुपनलिका घेऊन पंप, पाईपलाईन साठी लाखो रुपये खर्च केले आहेत या शेतकऱ्यांना रीतसर पाणी परवाने कधी मिळतील ? दुसरा प्रश्न आहे की उजनी ते कोळगाव भूमिगत बोगद्यावर असलेल्या जेऊर, कोंढेंज, सरपडोह, सौंदे, शेलगाव क, अर्जुननगर आदि शाफ्टमधून शेतकऱ्यांना पाणी उचल परवाने देण्यासाठी प्रक्रिया कधी सुरू करणार का ?
लोकांच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडून किमान आमसभेत तरी मिळाली अशी सर्व मतदारांची भावना आहे.