श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न:- पालकमंत्री गोरे, मा. खा. निंबाळकर यांची उपस्थिती
श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न:- पालकमंत्री गोरे, मा. खा. निंबाळकर यांची उपस्थिती
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा:- दि. १७ / करमाळा येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी गोरज मुहूर्तावर सायंकाळी 6:25 मी. मोठ्या आनंदमयी वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात एकूण 27 नव वधू-वर विवाह बध्द झाले. यावेळी वधू-वरांना विवाहासाठी लागणारे सर्व साहित्य देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मा. आमदार रामभाऊ सातपुते, मा. आमदार संजयमामा शिंदे, मंगेश चिवटे तसेच गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज, शिवाचार्य वेळापूरकर महाराज, शिवाचार्य माढेकर महाराज, शिवाचार्य परांडेकर महाराज यांच्यासह अनेक मान्यवर या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते. या विवाह सोहळ्यास तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सकाळी 10 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत 15000 लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच करमाळा शहरातून नवरदेवाची ढोल ताशा, बॅन्जो व फटाक्यांच्या आतिषबाजीत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
गणेश चिवटे हे अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्यांचे सामाजिक कार्य हे आदर्श घेण्याजोगे आहे. त्यांनी आज घेतलेला हा सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम हा प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना या माध्यमातून दिलासा देण्याचे काम चिवटे यांच्या माध्यमातून होत आहे. तसेच त्यांचे करमाळा तालुक्यात निराधार वृद्धांना व शालेय विद्यार्थ्यांना मोफत अन्नदानाचे कार्य मोठे असुन ते राजकारणासोबत समामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात करत आहेत असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गणेश चिवटे यांनी आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे कौतुक केले व पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच करमाळा येथे या भव्य दिव्य अशा कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आल्याने मनाला समाधान मिळाले असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.