पाटील गटावर बूमरँग होण्याची चिन्हे ; शिंदेमामाचे पारडे जड
पाटील गटावर बूमरँग होण्याची चिन्हे ; शिंदेमामाचे पारडे जड
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: करमाळा विधानसभा मतदारसंघात उमेदवारांचे प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप ऐकायला मिळत आहेत. आमदार संजयमामा शिंदे कधीही कोणावरही शक्यतो टीका करतच नाहीत आणि केली तर ते पातळी कधीच ओलांडत नाहीत. अगदी सौम्य शब्दात विनोदाच्या पद्धतीने हलकी टीका करतात. पाटील गटाची सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील रणनीती वेगळीच आहे. जाहीर प्रचार सभांच्या माध्यमातून आपण स्वतः काय केले ? किंवा भविष्यात काय करणार आहोत? हे सांगत बसण्यापेक्षा आमदार संजयमामा यांनी फक्त कागदोपत्री विकास केला, चुकीची कामे केली किंवा निधी आणलाच नाही, आणलेला निधी स्वतःच्या.. खिशात घातला, ते गावाकडे फिरकलेच नाहीत असी विकास कामांची खिल्ली उडवत असताना न्हावी, दलित, पारधी, मच्छीमार या समाज घटकांच्या भावनाही आपल्याकडून दुखावल्या जात आहेत याचे भान बोलणाऱ्या वक्त्यांना राहत नाही.
करमाळा येथील सभेमध्ये आमदार शिंदे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करत असताना न्हावी समाजाच्या भावना जगताप यांच्याकडून दुखावल्या गेल्या. त्यानंतर स्वतः माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिलगिरी ही व्यक्त केली.
त्यानंतर नारायण पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडी कडून आयोजित केलेल्या सभांमध्ये फरक पडेल असे सुज्ञ मतदारांना वाटत होते, परंतु फक्त विनोद, करमणूक, मनोरंजन आणि हास्य यापुरतेच मर्यादित राहिलेल्या या सभांमध्ये तिथून पुढेही सातत्याने विकास कामांची खिल्ली उडवत असताना विविध समाज घटकांची अवहेलना होत राहिली, त्याचा निषेध सोशल मीडिया मधून त्या त्या समाज घटकांनी केला. त्याचे पडसाद निश्चितच २० तारखेला उमटतील हे वेगळे सांगण्याची आवश्यकता राहणार नाही.
वांगी येथील जाहीर सभेमध्ये दलित समाजाचे नेते नागेश दादा कांबळे यांची उडवलेली खिल्ली, मच्छीमार बांधवांबद्दल केलेली टिप्पणी व साडे येथील सभेमध्ये बोलत असताना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पारधी समाजाला चोर ठरविण्याचा केलेला खटाटोप या बाबी निश्चितच धक्कादायक आहेत.
या उलट आमदार संजयमामा शिंदे यांच्या जाहीर सभामधून करमाळा तालुक्यातील ११८ गावांसह ३६ गावांमध्ये वेगवेगळे सामाजिक घटक त्यांचे मेळावे घेऊन आमदार संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत आहेत. एवढेच नव्हे तर दलित, अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्ते स्वतःहून समाजामध्ये जाऊन आमदार संजयमामा शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे अपक्ष निवडणूक लढविणारे आमदार संजयमामा शिंदे हे सर्व समाज घटकांना सामावून घेणारे नेतृत्व म्हणून आज त्यांच्याकडे संपूर्ण तालुका पाहत आहे. तालुक्यातील सर्व समाज घटकांबरोबरच महाविकास आघाडी व महायुतीतील अनेक पक्षांना सामावून घेणारे अपक्ष अशी मामांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.