करमाळा नगरपालिकेचा भोंगळ कारभार ; घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नागरिकांच्या आरोग्यास धोका झाल्यास करमाळा नगरपालिका प्रशासन जबाबदार - ( करमाळा शहराचे नागरिक )

करमाळा नगरपालिकेचा भोंगळ कारभार ; घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नागरिकांच्या आरोग्यास धोका झाल्यास करमाळा नगरपालिका प्रशासन जबाबदार – ( करमाळा शहराचे नागरिक )
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २५/ करमाळा नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. करमाळा शहरांमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटारी तब्बल आठ – आठ दिवसा नंतर साफ करत आहेत. कचरा गाडी आठ – दहा दिवसातून एकदाच येत आहे. इतक्या दिवसात घरोघरी जो कचरा साचतोय तो कचरा नागरिकांनी साठवायचा तरी कुठे ? आणि टाकायचा तरी कुठे? हा प्रश्न नागरिकांसमोर पडलेला आहे. कचऱ्याच्या प्रचंड दुर्गंधीने नागरिक प्रचंड वैतागले आहेत .डास, मच्छरांनी संपूर्ण शहरांमध्ये थैमान घातले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा साचलेला पडलेला असतानाही करमाळा नगरपालिका याकडे बघूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे . सफाई कामगारांनी गटारी काढून दोन – तीन दिवस झाले आहेत .परंतु तो गटारीतील काढलेला गाळ अजुनही तसाच रस्त्यावर पडलेला आहे. अजूनही तो गाळ रस्त्यावरून उचलून नेलेला नाही. पूर्वी गटारी साफ केल्यानंतर गटारीच्या खालील फरशा दिसायच्या आज जेव्हा गटारी काढण्यात येतात तेव्हा नावाला फक्त गटारीतील गाळ काढतात परंतु ती गटार पूर्णपणे स्वच्छ झालेलीच नसते. त्याच्यामध्ये आणखीन तेवढीच घाण परत निघेल एवढा गाळ गटरीत असतो. सफाई कामगारांना सांगायला गेलं तर ते ऐकून घेत नाहीत. अरेरावीची भाषा वापरतात . गटारींच्या अस्वच्छतेमुळे मच्छरांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. गेल्या कित्येक वर्षात घाणीच्या ठिकाणी किंवा गटारींवर कुठलीही फवारणी केलेली नाही. पिण्याच्या पाण्याच्या नळा जवळ सुद्धा गटरीतून काढलेला गाळ तसाच ठेवण्यात आलेला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार फोनवर संपर्क साधुनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे . परिणामी, दिवसेंदिवस करमाळा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत चाललेले आहे. कावीळ ,टायफाईड ,मलेरिया ,डेंग्यू हे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होणारे आजार पाहता संबंधीत प्रशासन याकडे लक्ष देणार का ? करमाळा नगरपालिका प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या धोक्यास पूर्णतः नगरपालिका प्रशासन जबाबदार असणार आहे.
करमाळा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही . फोन केल्यानंतर टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येतात. प्रसार माध्यमांनी सुद्धा अनेक वेळा फोन वरून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना तक्रारी करून सुद्धा करमाळा नगरपालिकेने आज पर्यंत करमाळा शहराच्या स्वच्छतेबाबत किंवा करमाळा शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, तरी करमाळा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यास त्याला संपूर्णतः करमाळा नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील अशी चर्चा नागरिक करत आहेत .
करमाळा शहरांमध्ये घाणीच्या साम्राज्याचे गल्लोगल्ली अनेक प्रश्न उपस्थित आहेत त्याचेच एक उदाहरण म्हणून चांदगुड गल्ली क्रमांक पाच येथे शौचालयाची व शौचालयाला जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. शौचालयाला जाण्याच्या रस्त्यावर प्रचंड घाणीचे साम्राज्य झालेले आहे. तेथून जाताना महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. करमाळा नगरपालिका प्रशासन प्रशासनाने या सर्व विषयांमध्ये लक्ष घालून करमाळा शहर स्वच्छ ठेवावे अन्यथा करमाळा शहरातील नागरिकांच्या आरोग्यास जर काही धोका झाल्यास त्याला संपूर्णपणे करमाळा नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल असे संतप्त नागरिक बोलताना दिसून येत आहे .
पूर्वी 30-35 वर्षापूर्वी करमाळा नगरपालिकेकडून दररोज गटारी काढण्यात येत होत्या. गटरीवर फिनेल औषधे फवारण्यात येत होते. महिन्यातून एकदा मच्छर कमी करण्यासाठी धुरकांडी फिरवली जात होती. परंतु कित्येक वर्षात अशी कुठलीही आरोग्याच्या विषयी काळजी घेण्यात येताना करमाळा नगरपालिकेकडून दिसलेले नाही त्यामुळे करमाळा शहरांमध्ये दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढतच चाललेले आहे. करमाळा नगरपालिका प्रशासनाने पूर्वीसारखे करमाळा शहराला स्वच्छ व निरोगी दिवस आणून द्यावेत अशी चर्चा संतप्त नागरिक करत असल्याचे समजते .