टेल भागास पाणी मिळणार लेखी आश्वासनानंतर उद्या होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित:- रवींद्र वळेकर यांची माहिती

टेल भागास पाणी मिळणार लेखी आश्वासनानंतर उद्या होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित:- रवींद्र वळेकर यांची माहिती
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ६/ कुकडी डावा कालवा उपविभाग क्र.12 चे उपअभियंता राजगुरु साहेब यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे सुरू असलेले उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी येत असणाऱ्या अडचणी दूर करण्यात यश आले असून आज (दि. ६) सायंकाळी ६ वाजले पासून टेल भागामध्ये पाणी दिले जाईल असे लेखी निवेदन दिल्यामुळे उद्या करमाळा कुर्डूवाडी रस्त्यावरती होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे याची नोंद टेल भागातील निंभोरे, घोटी, मलवडी, साडे, वरकुटे या गावातील शेतकऱ्यांनी घ्यावी अशी माहिती निंभोरे गावचे लोकनेते सरपंच रवींद्र वळेकर यांनी दिली आहे.
योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये नसलेल्या गावांना सर्रास पाणी दिले जात आहे. टेल भागातील लव्हे, निंभोरे ,घोटी इत्यादी गावांना राजकीय द्वेष भावनेतून पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे असा आरोप करत जर दि. ६ एप्रिल २०२५ पर्यंत टेल भागातील आमच्या गावांना पाणी सोडले नाही तर दि. ७ एप्रिल २०२५ रोजी आम्ही करमाळा कुर्डूवाडी रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा वळेकर यांनी दिला होता. आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना यश आले आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजने च्या टेल भागातील शेतकरी सरपंच रवींद्र वळेकर यांचे आभार व्यक्त करत आहेत.